Tuesday, October 31, 2023

मराठा तितुका मेळवावा !


        



          छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वारस आहोत हे सांगताना महाराष्ट्रातल्या कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या माणसाची छाती रूंदावते.महाराजांची जयंती किंवा राज्याभिषेक सोहळा साजरा करतांना आपण एक असतो मात्र याशिवाय कोणत्याही धार्मिक अथवा सामाजिक विषयांत आपण स्वतंत्र जातीचे अभिमानी बनतो.एकोणिविसाव्या शतकापासून आजतागायत अनेक समाजसुधारकांनी किंवा पुढा-यांनी या जातींच्या भिंती पाडण्याचा प्रयत्न केला पण सरकारी कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची सार्वजनिक जीवनातली काळजी घेऊन प्रत्येकजण जातीचे भूत डोक्यावर घेऊन चालतो आहे.यापेक्षा कहर म्हणजे आपण जातीवंत कसे आहोत हे आपाआपल्या जातीच्या वर्तुळात सांगताना पुढे असतो.
             गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेला आहे.एकवेळ महाराष्ट्रव्यापी असलेले आंदोलन आता जालन्यातील अंतरवाली सराटी येथे स्थिरावले असून त्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील नावाचे एक सामान्य शेतकरी करताहेत.कुठल्याही राजकीय पक्षाचं पाठबळ न घेता किंवा राजकीय अभिलाषा न ठेवता केवळ नी केवळ मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवल्याने शिक्षण आणि सरकारी नोक-यांना मुकावे लागलेल्या युवापिढीला न्याय मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्यही पणास लावून ठामपणे मैदानात उभा ठाकलेला हा यौद्धा सरकारलाही त्याच्या दाराशी आणतो आणि  उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतो आहे.

           जरांगे पाटलांनी कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण मागितले आणि  नव्या मुद्द्याला वाट फुटली.जे यापूर्वीच व्हायला हवे होते. जे दोन सख्खे भाऊ एका पातळीवर आले असते तर महाराष्ट्राचे सामाजिक समीकरण बदलले असते.भारताचे पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात  जातीच्या उतरंडीतील समाजाला शिक्षणात,सरकारी नोक-यात व स्थानीय संस्थांच्या राजकारणात समान संधी मिळवून देण्यासाठी मंडल आयोग अंमलात आणला.त्यात त्यांचे सरकार पडले.मंडल आयोगाचा अंगिकार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य.व्यवसायावरून जाती ठरविल्या गेल्या व त्यांना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण दिले गेले.ज्यावेळी आयोगासमोर प्रत्येक जातीच्या प्रतिनिधींनी आपण कसे मागासले आहोत हे मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मराठ्यांच्या प्रतिनिधींनी स्वत:ला वेगळे समजून आपण कसे उच्च आहोत हे दाखवतांना मागासलेपण या शब्दापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला.कानातल्या भिकबाळ्या व तूप लावलेल्या मिशा पोट भरायला कामी येत नाहीत किंवा त्यामुळे तुमचं स्वत:च कर्तृत्व सिद्ध होत नाही तर त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि  नोकरीची किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध होणे आवश्यक असते हे तेव्हा त्यांच्या लक्षात आले नाही.
        मुळात जमीन कसवणारा तो कुणबी.जेव्हा गावातल्या गावात शेतक-यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात या अपेक्षेने गाव वसवतांना अ़ठरा व्यवसाय करणारी कुटुंबेही गावात आणली गेली.यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने असायचा कारण शेती हे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते.हा शेतकरी स्वत:च्या कुटुंबाला किती लागेल यांचा अंदाज करतांना जे लोक आपल्या गरजा भागवितात त्यांनाही द्याव्या लागणा-या धान्याचा अंदाज घेऊन शेतीचा पसारा आखत असे त्यामध्ये सुतार, कुंभार,न्हावी,तेली,साळी,महार असे सगळेजण सुगीच्या दिवसात आपाआपल्या शेतकरी कुळांच्या घरी जाऊन धान्य गाेळा करीत.ही शेती मराठेही करीत आणि कुणबीही करीत होते.मग प्रश्न उरतो मराठा आणि कुणबी ही वेगळी नावे कशी पडली.
          या पृथ्वीतलावरील माणूसच नाहीतर प्राणीही आपण इतरांपेक्षा वेगळे किंवा श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. याच्यातूनच जगण्याची शर्यत निर्माण झाली.त्या शर्यतीत जो वरचढ ठरला तो तो स्वत:ला श्रेष्ठ आणि  इतरांना कमी लेखू लागला.त्यांची कुटुंबे पुढे त्याच विचारात वाढली विस्तारली. ज्यांनी गावाचे नेतृत्व केले त्यांचा इतिहास त्यांच्या पुढील पिढ्या पुढे घेऊन आल्या तसेच ज्याला गावाची सेवा करण्यासाठी नेमले त्याच्या पुढच्या पिढ्यांनीही तेच काम करावे असे गृहीत धरण्यात आले  किंवा लादण्यात आले.त्यांच व्यवसायावरून त्यांची जात ठरली.परंतु या जातीत उतरंड नव्हती तर प्रत्येक व्यवसायाची गरज आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे हे प्रत्येकजण जाणून होता किंबहुना प्रत्येक जण एक दुस-यावर अवलंबून होता. आमच्या शिवछत्रपतींनी स्वराज्याच्या चळवळीत या सगळ्यांच्या कलागुणांचा वापर करून घेतला म्हणूनच शिवाजी राजांना प्रत्येकाच्या हृदयमंदडलावर आदराचे स्थान होते.
          या देशात व्यापाराचे निमित्त करून आलेल्या इंग्रजांनी आमची ताकद कमकुवत करण्यासाठी अठरापगड जातींची एकत्रीत मोळी मोकळी केली.प्रत्येकाला त्यांच्या जातीची अस्मिता वेगळी असल्याचे भासवून माळेतून मणी मोकळे करावेत तसे जातींचे गट वेगळे केले  गेले.एकात्मतेचा दागिना नष्ट झाला आणि जाती जातीत अहमिका सुरू झाली.पुढे पेशवाईत त्या द्वेषाचा कडेलोट झाला.ते लोण गावागावात पोहोचले.जातीच्या उतरंडीत गावात कमी संख्येने असलेले आणि  पुर्वीपार शेतीपुरक किंवा शेतक-यांच्या गरजा भागविण्याचे काम करतांना शेतक-याच्या धान्यावर अवलंबून असणारे खाली खाली ढकलले गेले.त्यात सर्वच समाज देवाधर्मावर अगाढ निष्ठा बाळगणारा असल्याने त्याने गावाची जगण्याची दैनंदिन रित बिघडविण्याचे किंवा काम थांबवण्याचे धारिष्ट्य केले नाही.
           महाराष्ट्र राज्य म्हणून १९६० ला काही सीमा आखून दिल्या गेल्या त्यातील भूमी हा आजचा  महाराष्ट्र आहे.मात्र शिवकाळात हा महाराष्ट्र फार विस्तीर्ण हाेता.पेशवाईत गुजरात,मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश, आणि कर्नाटकातील अनेक प्रदेशावर मराठ्यांचे वर्चस्व होते म्हणजे तिथपर्यंत महाराष्ट्र होता आणि  तिथला राज्यकर्ता ,त्याचे प्रशासक व सैन्य हे मराठा होते.त्यावेळी इंग्रजांप्रमाणे महार बटालियन किंवा मराठा रेजिमेंट अशी सैन्याची विभागणी केली नव्हती तर प्रत्येकजण स्वत:ला प्रथम मराठा संबाेधत होता.हे युद्धावर जाणारे,राज्यकारभारात नोकरी करणारे सर्वचकाही पिढ्यान पिढ्याच्या सरदार घराण्यातून आलेले  नव्हते तर ते शेतकरी कुटुंबातून आलेले,कुणी मेंढपाळ होता,कुणी व्यापारात चमकदार कामगिरी करणारा होता ,कुणी त्याच्या वाक्चातुर्यामुळे नजरेत भरलेला होता,कुणी कुस्तीचा आखाडा गाजवणारा होता तर कुणी बहुरूप्याच काम वठवणारा होता पण तो मुळात शेतकरीच होता.शिवराय जेव्हा एखाद्या गावात जायचे तेव्हा त्या गावातील घडामोडींची माहिती त्यांच्या कानावर यायची मग त्यातूनच आपल्या सैन्य भरतीसाठी एखाद्या शेतक-यांच्या अनेक मुलांपैकी चारदोन मुलांना स्वराज्याच्या कामी पाठव असे सांगताच आपली शेती चालू राहावी यासाठीचा विचार करून काही मुलांची तो शेतकरी हसत हसत सैन्यात रवानगी करायचा.ही सैन्यात गेलेली बरीच मंडळी अनेक जिंकलेल्या प्रदेशात वेगवेगळ्या हुद्यानुसार स्थायिक झाली.आज आय ए एस अधिका-याला जसा समाजात मान असतो तसा त्या काळात हातात तलवार घेऊन लढणा-यास मान होता.अशा तरूणांची लग्ने सुद्धा अशा तलवारबाजी करणा-या कुटुंबातील मुलींशी व्हायचा.तो एक खानदानी दाखवण्याचा एक रिवाज बनली असला तरी एकाच व्यवसायातील सुखदु:खे समजून घेण्याचा समंजसपणा त्यात  होता.त्यातूनच पुढे ९६ कुळी मराठा ही संकल्पना दृढ होत गेली.आज एकाच बापाच्या दोन मुलांपैकी एक मुलगा मुंबई पुण्यात जातो.तो पैसे कमवितो व चाकरमानी होतो.दुसरा मुलगा गावातली शेती करतो व मिळेल त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करतो.लग्नाच्या बाजारात चाकरमान्याला जास्त महत्त्व दिलं जातं आणि शेतक-याला मात्र अनेक उंबरे झिजवावे लागतात. मराठा आणि  कुणबी हे एकाच घरातले असून परिस्थितीमुळे त्यांच्यात दरी निर्माण झाली आणि  मनुष्य स्वभावाप्रमाणे ज्याला मिरवायचे आहे,आपण वेगळे आहोत हे सांगण्याने त्याला काकणभर मांस अधिक चढल्यासारखे वाटते तो गरीबाला आपल्या बरोबर बसवत नाही.तसे तलवारबाजी करणारा शेतक-यास कमी लेखू लागला.
          मराठ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत तशा अनेक कुणबी कुटुंबाकडे जमिनी आहेत.जसे मराठे खोत आहेत तसे काही गावात कुणबीही खोत आहेत. एकेकाळी अस्पृश्य समाजाला हीन पद्धतीची वागणूक मिळते तशी कुणबी लोकांनाही मिळत होती.स्पृश्य अस्पृश्यता स्पर्शात नव्हती,रोटीत टोकाची नव्हती मात्र बेटी व्यवहारात कटाक्षानं पाळली जात होती.गाव रहाटीत त्याला  सेवक म्हणूनच राबविले जायचे तर मराठ्यांच्या लग्नात झाडू मारणे व जेवल्यानंतर पत्रावळी उचलून खरकटे साफ करणे अशी कामे करावी लागत.मुलींचे माहेरपण किंवा सासरी जातांना सोबत म्हणून त्याला सक्तीने जावे लागत असे.बरे मराठा व कुणबी यांच्या खाण्याच्या पद्धती,सण समारंभ साजरे करण्याच्या पद्धती सारख्याच आहेत.हिंदू धर्मातील सर्व संस्कार व रिती रिवाज हे पाळीत असले तरी मराठ्यांनी बांधलेल्या देवळातल्या देवांची यांनी पूजा करायची नाही किंवा मराठ्यांच्या बरोबर याने वागावयाचे नाही अशा अमानवी पद्धतीने यांना वागविण्यात आले.पण आज कुणबी समाजातील मुले शिकली आहेत.मोठ्या अधिकाराच्या पदांवर आहेत.त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना आदराचे स्थान मिळते आहे.पण ते जेव्हा आपल्या गावच्या सिमेच्या आत जातात तेव्हा त्यांच्याकडे पुर्वीच्याच नजरेने पाहिले जाते.आपल्या जन्मदाती मातीचे ऋण मानतात म्हणून ते उफाळून येत नाहीत या त्यांच्या सोशिकतेला सलाम करायला हवाय.
           हिंदु धर्मातील किंवा जगभरातल्या सर्वच धर्मातल्या जातीच्या उतरंडीतील लोक आपआपल्या जातीला चिकटून आहेत.हिंदू धर्मात ब्राह्मणांचे,श्रेष्ठत्त्व क्षत्रीय मान्य करतात.वैश्य समाज ब्राह्मण व त्यानंतर क्षत्रीयांचे श्रेष्ठत्व मान्य करतात तसे शुद्र वरील तिघांचेही श्रेष्ठत्व मान्य करतात म्हणुनच जाती टिकून आहेत.जाती जातीत वरिष्ठ व कनिष्ठ अशा दर्जांची उतरंड मान्य केलेली आहे म्हणुन लग्नाच्या बाजारात आपल्या जातीतीलच स्थळे शोधण्याचा अट्टाहास आजही आहे.
           आज जग जवळ आले आहे.आपली परदेशात गेलेली मुले  तिथलेच स्थळ बघून तिथेच स्थायिक होऊ लागली आहेत.त्यांची जात किंवा धर्म नाईलाजाने का होईना पण आपण स्विकारायला लागलो आहोत. मग आपल्याच मातीतल्या आपल्याच प्रमाणे ज्याची जीवन जगण्याची पद्धती आहे त्याला आपण का स्विकारत नाही याचे आश्चर्य वाटते.बरे आपल्या राज्यघटनेने प्रत्येकाला हक्क,कर्तव्य,अधिकार देतांना धर्माची किंवा जातीची अट घातली नाही त्यामुळे प्रत्येकजण आपले आकाश मुठीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे.कधी कधी शंभर एकर जमिनीचा मालक असलेल्या शेतक-याचा मुलगा दहावीपर्यंत घुटमळतो आणि  आयुष्यभर धुणी भांडी करणारीचा मुलगा डॉक्टर -इंजिनिअर होतो तेव्हा त्याला त्याची जात किंवा धर्म मदत करीत नाही तर जीवन जगण्याच्या मार्गावर तुमचे कष्ट आणि  जिद्द कामी येते हे जरी लक्षात आले तरी आपण जातीच्या कचाट्यातून मुक्त होऊ.
          आपला महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो पण तो देशातील इतर राज्यांपेक्षा अधिक पुरोगामी आहे असं म्हणावयास हवे कारण तो पूर्णतया पुरोगामी झालेला नाही.या मातीत होऊन गेलेल्या अनेक समाज सुधारकांच्या कामामुळे व स्वातंत्र्यानंतर झालेल्या शिक्षणाच्या प्रसारामुळे आपण पूर्ण पुरोगामित्वाकडे वळत असतांनाच निवडणुकीच्या राजकारणाने घात केला. जातींचा अभ्यास करून उमेदवाराची निवड करायची आणि जातींची एक गठ्ठा मते मिळविण्यासाठी
जाती जातीत विष कालवायचे हे प्रयोग यशस्वी केले गेले आणि  पुढे जातीनिहाय पक्षांचा उदय झाला.यामुळे उच्च शिक्षीत विज्ञानवादी युवकसुद्धा जातींमध्ये घट्ट बसण्याला अधिक प्राधान्य देऊ लागला आहे हे लोकशाहीला घातक आहेच तसेच गावागावातील शांती सलोखा बिघडविण्यास कारणीभूत ठरणार आहे.
           आपण थोरामोठ्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साज-या करण्याचे आता बंद करून त्या दिवशी त्यांच्या विचारांची पारायणे करून त्यांचे विचार आचरणात आणण्याचे उपक्रम हाती घ्यायला हवेत. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा रथ हाकतांना उभ्या महाराष्ट्रीयनांना केवळ मराठा या नावाने संबोधले व त्यांना आपल्या जवळ बसविले , एका झेंड्याखाली आणले तसे महाराष्ट्रात पुन्हा घडून येण्यासाठी
 ' मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा । '
या वचनाप्रमाणे चालणे ही काळाची गरज आहे.

सुभाष लाड
९८६९१०५७३४




         
 
         

Saturday, October 28, 2023

८ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने




       कोरोनाचं भयाण सावट आलं नसतं तर यावर्षी सलग नववं संमेलन साजरं करू शकलो असतो पण निसर्गापुढे आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे एक वर्ष पूर्ण तयारीसाठी मिळाल्यानं सातवं  संमेलन आठव्या वर्षी नुसतंच साजरं झालं नाही तर साहित्य पंढरीच जणू प्रभानवल्ली खोरनिनको येथे अवतरली.त्याच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आठव्या साहित्य संमेलनाचं आमंत्रण जामदा खो-यातील सामाजिक कार्यकर्ते संजय सुतार यांनी दिले.राजापूरातील पुढील संमेलनाबाबत योजना आखायला कार्यकर्त्यांची सुरूवात झाली.
            कोकणातील प्रत्येक गावात पुरेशा प्राथमिक शाळा आणि  पंचक्रोशीत किंवा दशक्रोशीत हायस्कूलची व्यवस्था असल्याने इथले साक्षरतेचे प्रमाण समाधानकारक असले तरी पाठ्यक्रमाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणा-या शिक्षक आणि  संस्था अभावाने आहेत.साहित्य संमेलनासारख्या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडेल अशी चिंता व्यक्त करणारेही आम्हांस भेटले तर कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक कमी झाल्याने त्यांना वर्गाबाहेर काढता येणार नाही असे ऐकताच  स्पर्धा परीक्षांत आमचा टक्का कमी का आहे याचा शोध लागला.
          गेल्या सात साहित्य संमेलनांचा विचार करतांना यावेळेला मंडप बांधण्याऐवजी एखाद्या मोठ्या सभागृहाचा विचार करावा जेणे करून आयोजकांवर खर्चाचा भार कमी होईल.तळवडे गावात मुख्य रस्त्यालगत 'प्रभावती मंगल कार्यालय 'सर्व सोयींनी युक्त असल्याने तिथेच जागा निश्चित झाली.संजय सुतारांनी मग मोर्चा वळवला तळवडे गावचे धुरीण आप्पा साळवींकडे.साहित्य संमेलनाचा उद्देश आणि त्याचं नेमकेपण त्यांना समजावून सांगितले.आप्पा साळवींनी तर पहिल्याच भेटीत होकार दिला व ग्रामस्थांशी बोलून नियोजन करूया असे सांगितले.लवकरच त्यांनी ग्रामस्थांची बैठक बाेलावली.बीनविरोध नवनिर्वाचीत सरपंच मा.श्रीमती गायत्री साळवी यांनी समस्त ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ व संघाचे पदाधिकारी उपस्थित असलेल्या बैठकीत संघाच्या ८ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद तळवडे गाव स्विकारीत असल्याचे जाहिर केले.तळवडेच्या ग्राम वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाची घोषणा झाली आणि ख-या अर्थाने सगळेजण तयारीला लागले.
           पूर्वी अर्जुना नदीच्या पात्रात तळवडे गावात आठवडी बाजार भरत असे .पुढे तो पाचल भागात आला आणि  वाढतच गेला.पण ख-या अर्थाने तळवडे गावाची प्रसिद्धी ही रवींद्र प्रभुदेसाईंच्या पितांबरीमुळे झाली.त्यांच्या या उद्याेगाने त्यांचे जगभर नाव केले तितकेच त्यांच्या उद्योगामुळे तळवडे गाव व परिसरातील अडिचशेच्या आसपास भूमीपुत्रांना गावातच राहून रोजगार मिळाला हे महत्त्वाचे वाटते.रत्नागिरीतील गद्रे मरीन कंपनीत कोकणातीलच मुलांना रोजगार दिला जातो या गोष्टींचा आम्हास वाटतो.त्यांचा हा आदर्श कोकणातील इतर उद्योजकांनी घेऊन इथल्या तरूणांना इथेच रोजगार उपलब्ध केल्यास कोकणातील अनेक बंद घरे उघडी राहण्यास मदत होईल.ग्रामीण मराठी साहित्य संमेलन याच गोष्टींना अधोरेखीत करण्याचे काम करते हे जेव्हा ग्रामस्थांना पटते तेव्हा ते या संमेलनाच्या प्रेमात पडतात.
           तळवड्याचे स्व. सीताराम वामन देसाई ज्यांनी रायपाटण येथील आरोग्य केंद्राच्या उभारणीत परिश्रम घेतले ते संघाच्या संस्थापकांपैकी एक आहेत हे जेव्हा ग्रामस्थांना सांगितले तेव्हा त्यांना संघ हा आपलाच आहे हे वाटू लागला.त्यामुळे वेळ कमी असला तरी संमेलन धुमधडाक्यातच होईल याची खात्री वाटली.तळवडे ग्रामस्थांच्या सोबत संघाचे कार्यकर्ते व अनेक संमेलनात सहभागी झालेले पाचलचे किशोरभाई नारकर,सिद्धार्थ जाधवसर तसेच नव्याने जोडले गेलेले पण अनुभव संपन्न संदीप परटवलकर सर हे सोबत असतांना काळजी काम नाही.त्यात सभागृह आणि  जेवणावळीचा भार संजय सुतारांनी मोठ्या मनाने स्वत:च स्विकारल्याने चिंतेची बाब तशी राहिली नाही.
          दहा वर्षापूर्वी कोकणची मानसिकता बदलण्यास साहित्य संमेलन कारण ठरेल हा आम्ही बाळगलेला आशावाद आता खरा ठरू लागला आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यासपिठावर आपल्याला  स्थान असेल तरच आपला पूर्वतयारीत सहभाग असेल ही मानसिकता आता बदलली आहे.बीन खुर्चीचं साहित्य संमेलन आता अनेकांना रूचू लागलंय.कामानेच माणूस मोठा होतो त्यासाठी पदाची किंवा खुर्चीची गरज भासत नाही हे ही पटू लागलंय.आम्ही सगळेच कर्तबगार आहोत.आमच्यात लहानमोठा हा भेद असणार नाही तर ज्याची वेळ येईल तो व्यासपीठावर जाईल.त्याच्यासाठी मी टाळी वाजवीन तर माझ्यासाठी तोही टाळी वाजवील हा विश्वास घेऊन लोक जेव्हा कामाला वाकतात तेव्हा कुठेही कुणाला कमीपणा वाटत नाही. प्रत्येकाला माझं काम अधिक उजवं झालं पाहिजे ही स्पर्धा बघायला मिळते.भविष्यात सार्वजनिक जीवनात हे चित्र अधिक आनंददायी असेल अशी खात्री वाटते.
           सार्वजनिक उपक्रम म्हटला  की कितीही  वेळेपूर्वी पूर्वतयारी पूर्ण करायची असं ठरवलेलं असलं तरी शेवटच्या दिवसांतली लगबग असेल तरच कार्यक्रम असल्याचे चेह-यावर दिसते.जेव्हा चेहरे बोलू लागतात तेव्हा कार्यक्रम यशस्वी होणारच हा आशावाद मूळ धरू लागतो.तळवडे ग्रामवासीय सुरूवातीला चाचपडल्यागत वाटत होते. पण  क्रांतीज्योतीच्या निमित्ताने जमलेल्या लोकांचा उत्साह पाहिला आणि संमेलन उत्सवी वातावरणात संपन्न होणार याची खात्री वाटली.
        नव्या गावात नवीन माणसं भेटतात.लोकसंग्रह वाढतो त्याचबरोबर प्रत्येकाच्या अनुभवाची शिदोरी आपल्या गाठीस येते आणि बरंच काही शिकायला मिळतं.या परिसरात अगदी पुढील चारदोन वर्षांत शतकाची आयुमर्यांदा ओलांडण्यास उत्सुक असलेली,हिंडती फिरती माणसं भेटली.आपसुक आमचे हात त्यांच्या चरणांवर वाकले.माझा समाज निरोगी असल्याचा तिथं प्रत्यय आला.कोणताही गाव गावातल्या धुरीणांच्या विचारांचा पाईक असतो.ज्यांना त्याचे महत्त्व पटले तेच त्या साखळीत राहून गावचा विकास साधू शकतात.मीच शिवाजी असे प्रत्येकजण म्हणतो तेव्हा गाव भरकटतो.तळवडे गाव शांत,शिस्तप्रिय विशेषत: क्रयशक्तीचा उपयोग करून स्वत:चे जीवन फुलवतांना दिसतोय.पितांबरीच्या निमित्ताने उद्याेगाची संधी आली तिचाही योग्य रितीने उपभोग असल्याचे आढळले.
        गावात विविध क्षेत्र असतात.त्या त्या क्षेत्रात ती ती माणसं काम करीत असतात.परंतु गावसमाज म्हणून गावाच्या भल्यासाठी म्हणून गावातल्या सगळ्याच क्षेत्रांना मार्गदर्शन करणारी मंडळी असतात. तळवड्यातले आप्पा साळवी,महादेव गवस,सुरेश गुडेकर,पंडितसर,वसंत प्रभुदेसाईसर ही आणि  अनेक मंडळी मला इथे एकोप्याने वागतांना दिसली.सोबत तरूणांना घेऊन नव्या विचारांचाही आदर करतांना दिसली.  त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या फंदात नपडता,सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकासाला महत्त्व देत बिनविरोध सदस्य पाठविले.माझ्या दृष्टीने हे एक आदर्श गाव आहे. या गावात ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होतं आहे.त्यानिमित्ताने मला गावात वावरता आले हे माझ्यासाठी भाग्याचं आहे.
      तळवडे वासियांचा मी मनापासून आभारी आहे.
                 सुभाष लाड


साहित्य संमेलनाची घोषणा  करताना घेण्यात आलेल्या
पत्रकार परिषदेत सहभागी पत्रकार
               साहित्य संमेलन नगरी सजवतांना


रांगोळी प्रदर्शनातील एक रांगोळी

                          संमेलनाचा मुख्य बॅनर


ग्रंथदिडीतील बैलगाडीत संमेलनाध्यक्ष

                  
                     संमेलनात सहभागी महिला कार्यकर्त्या

                   संमेलनात असे विक्री कक्ष असतात.


                 नववधुंचा आहेर देऊन सन्मान केला जातो.






आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने संमेलन गाजवणा-या युवती


संमेलन यशस्वी झाल्यानंतर विसावलेले कार्यकर्ते


                     पहिल्या रांगेत मान्यवर


                     वय वर्षे ९५ ,यथोचीत सन्मान



          मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम








                         प्रथितयश साहित्यिकांचे विचार 


                               ध्वजारोहण

पुस्तक प्रदर्शनातील एक कक्ष


संगीत मेजवानी


                रसिकांची मांदियाळी






Monday, October 23, 2023

चंदुभाई देशपांडे आणि संघ

 

                   ओणी मार्गे पाचलकडे जाताना येळवण गाव लागतं.सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजेश  देशपांडे यांचे हे गाव ही आजची ओळख असली तरी गेली सहा दशके एक क्रियाशील सामाजिक कार्यकर्ता,व्रतस्थ शिक्षक, दूरदृष्टीचा शिक्षणतज्ञ आणि अन्याविरूध्द लढण्यासाठीचे हत्यार म्हणून राजकारणाचा वापर करणारे,दिलदार वृत्तीला गोड वाणीची साथ मिळाल्याने अनेकांचा मित्र,मार्गदर्शक या नात्याने आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून उभ्या रत्नागिरीला सुपरिचीत असलेले *मा.चंदुभाई देशपांडे* यांचे गाव म्हणून ओळखले जाते.

            अनेक दिवसांपासून त्यांना भेटायची इच्छा होती.नेमके मिळंदचे सुहासभाई आयरे यांच्याबरोबर गप्पा मारतांना चंदुभाईंचा विषय निघाला आणि आजच आपण भेटायचे असा बेत ठरला.मग सोबतीला पाचलचे किशोरभाई नारकर आणि  मनोहर खापणे काॅलेजचे प्रा.डॉ.विकास पाटील होतेच.

            किशोरभाईंनी ओळख करून देतांनाच त्यांना थांबवत "सुभाष लाड  हे नाव बरेच दिवस ऐकून आहे "असे चंदुभाई म्हणाले आणि  " राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे नाव मी लहानपासून जाणत असतांना संघाचे १९५४ सालातील अधिवेशन करक या गावी असतांना त्या वेळचे मुंबई राज्याचे आरोग्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण आले होते त्यावेळी त्यांच्या स्वागताला आम्हा मुलांना रायपाटण इथल्या रस्त्यावर उभे केले होते.मी तेव्हा सहावीत शिकत होतो." ही आठवण सांगतांना अणुस्कुरा घाट फोडून राजापूर - कोल्हापूर रस्ता करावा ही मागणी त्या वेळच्या अधिवेशनात केल्याचे त्यांनी नमूद केले.

            संघाच्या स्थापनेच्या काळातील अॅड.सदानंद शेट्ये हे आजही वयाच्या ९१ व्या वर्षातही संघाच्या कार्याची माहिती जाणून घेत असतात.आज मला संघाच्या दुस-या वर्षाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले ८१ व्या वर्षीही तरूणाईच्या उत्साहात आठवणी सांगत असतांना संघाला तेवढ्याच ताकदीने इथपर्यंत आणणा-या कार्यकर्त्यांपैकी मी ही एक असल्याचा अभिमान वाटला.

             गप्पा संपत नव्हत्या पण कुणीतरी त्यांचा जवळचा मित्र आजारी असून त्याला तात्काळ रत्नागिरीला हलवायचं आहे असा निरोप आणला.त्याला आपली गाडी घेऊन जा असं सांगून चावी त्याच्या हातात दिली व पाकिटातील पैसेही घेऊन जा असे सांगितले.त्याने त्यांचे पाकिट उघडले, हवे तेवढे पैसे घेतले आणि घाई गडबडीत निघून गेला."माझा अत्यंत जवळचा माणूस " असे म्हणताना मित्रत्वाच्या  ओलाव्याने आलेली चमक लपली नाही.

              काळोखाची झालर पुसटशी दिसतांना सगळ्यानीच निघण्याची हालचाल केली पण मी एक फोटो पाहिजे म्हणून चंदुभाईंच्या शेजारी बसलो.

*सुभाष लाड*

४ आक्टोबर २०२३








संघाच्या शिपोशी येथील ९ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


अभिप्राय -🍁🍁🍁🍁🍁🍁

१) लाड सर आपण खरंच एक वेगळे रसायन आहात.सर आपल्या जुन्या जाणत्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कार्याचा यथोचित सत्कार करून त्यांना आपल्या "सुभाष पर्व" या स्तंभातून आपल्या भागातील लोकांना त्यांचा परिचय करून देता.आपण जे सामाजिक भान असलेलं कार्य करत आहात ते अनमोल असं आहे. अशा ह्या तुमच्या व्यक्तिमत्वाला माझा शतशः प्रणाम.

श्री.सुरेश हांडे,जुन्नर  


२)शुभाष भाई,आपले सहृदय मनःपुर्वक अभिनंदन! आपण असेच कायमच लिहित रहावे,आणि विधात्याने आपल्या हाताला धरून सतत लिहिते ठेवावे ! सर्वच केवळ अप्रतिमच !

विश्वनाथ चव्हाण,कोंडगे

३) लाड साहेब आपणास आदरयुक्त प्रणाम🙏

इतरांबद्दल अचूक वर्णन करता साहेब.👌👍

रमेश गुरव,वापी,

अर्जुना नदी जलपूजन २०२३

 

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ ,मुंबई या संस्थेचे ८ वे ग्रामीण साहित्य संमेलन राजापूर  तालुक्यातील तळवडे या गावी संपन्न झाले.संमेलनाच्या पूर्वसंध्येला या गावाच्या सिमेवरून जाणा-या अर्जुना नदीचे जलपूजन करण्यात आले.स्त्रियांनी डोक्यावर कलश घेऊन नदीकडे प्रयाण केले.जलकलश भरून काठावर आणून ब्राह्मणाकरवी त्याचे पूजन करून आरती करण्यात आली.

         मूर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नदीची स्वच्छता राखण्याचे प्रबोधन करणारे पथनाट्य सादर केले.त्यानंतर सर्व आबालवृद्ध नदीकाठावर आले व त्यांनी श्रद्धापूर्वक प्रज्वलीत दीप नदीप्रवाहात सोडले.
         हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता गावच्या सरपंच श्रीमती गायत्री साळवी,अमित साळवी,वसंत प्रभुदेसाई यांनी विशेष मेहनत घेतली.











Thursday, October 19, 2023

कोकणातील संस्कारीत तरूणाई !




       काल परवा मुंबईतील तरूणांने गळफास लावून स्वत:ला संपविले.अधिक माहिती घेतांना कळले की मोबाईलवरून खेळ खेळण्याच्या नादात तो कर्जबाजारी झाला.मग धमक्यांचे सत्र सुरू झाले त्यात त्याला आत्महत्येशिवाय पर्याय सापडला नाही.तसंच ड्रगच्या आहारी गेलेली कित्येक मुलं आज स्वत:चं आयुष्य बरबाद करून  जात आहेत.एखाद्या सजग पालकाच्या घरात हे चुकून आले असेल पण नव्वद टक्के पालकांनी आवश्यक तेवढे लक्ष मुलांकडे दिलेले नसते,मुलाच्या कमालीच्या कोडकौतुकामुळे चुकीच्या क्षणी रागे भरण्याचे आणि योग्य अयोग्य काय हे समजावण्याचे काम केलेले नसते किंवा त्याबाबत उशीर झालेला असेल आणि मूल हाताबाहेर जाते.अशी अनेक कारणे यामागे असू शकतील मात्र लहानपणापासून मुलाला इतर मुलांच्यात खेळण्याची,बागडण्याची संधी निर्माण करून देणे आवश्यक असते.तेच मूल किशोरवयात असतांना ते कोणत्या मित्रांच्या सहवासात वावरतेय हे पाहून त्याला चूक काय बरोबर काय हे सांगणे महत्वाचे ठरते.असे जे पालक करतात त्यांची मुले सुजाण नागरिक बनण्याच्या मार्गावर असतात ती मुले समाजास हवीहवीसी वाटतात.

         अशा जागरूक पालकांची मुले गेली सात वर्षे स्वत:चे जगणे समृद्ध करतांना ज्या समाजातून आपण आलो त्या समाजाच्या संस्कृतीचे वहन करण्याचे नव्हे संवर्धन करण्याचे काम करताहेत.सातत्याने एकोप्याने डोंबिवलीतील मराठा हितसंवर्धक मंडळाच्या मराठा मंदिरात श्रावण महिन्यात येणा-या शनिवार रविवार पाहून भजन स्पर्धांचे आयोजन केले जाते.सतत दोन दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमात सहभागी होणारी भजन मंडळे आणि  श्रोतृ वर्गाला सुखद अनुभव मिळवून देण्यासाठी त्यांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांची धावपळ,लगबग पाहिल्यानंतर गावाकडच्या लग्नविधीत घरच्यांची होणारी तारांबळ नजरेसमोर येते.तिथे जसा घरातला प्रत्येक सदस्य मीच यजमान आहे या जाणिवेने येणा-या प्रत्येकाचे स्वागत,विचारपूस करून चहापान,जेवण यांचा आग्रह करण्यातली आपुलकी ओसंडून वाहत असते तद्वत या मंडळाचे कार्यकर्ते वावरतांना दिसतात तेव्हा ते सुरांनी भरलेले सभागृह स्वर्गासम वाटू लागते. इथे येणारा स्पर्धक,श्रोता, सन्मानार्थी किंवा पाहुणा क्षणभर स्वत:चे आयुष्य विसरून त्या आनंदात न्हाऊन घेतो वाटतं हा कार्यक्रम आणखी लांबतच जावा.
              डोंबिवली म्हणजे आता दुसरी मुंबई म्हणून ओळखली जाते.न शिकता किंवा अर्धवट शिक्षण घेऊन आलेल्या बागकाम,घरकाम किंवा शिपाई अशा नोकरीत समाधान मानणा-या कोकणी माणसांमुळे एके काळी मुंबई भरून गेली परंतु पुरेसे शिक्षण घेऊन आलेल्या परप्रांतीयांनी कोणतेही काम करण्याच्या वृत्तीमुळे छोट्या व्यवसायापासून मोठ्या हुद्दाच्या मोठ्या पगाराच्या नोक-या बळकावून बसल्याने व जीवघेण्या महागाईने कोकणी माणसाला मुंबईत राहणे परवडेनासे झाले व तो ठाणे ते कल्याण, मीरा रोड ते विरार अशा उपनगरात कोकणी माणूस फेकला गेला.कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तिथे तो आपल्या संस्कृतीचे रोपटे लावतोच.त्यामुळे आजुबाजूची मराठी माणसं एकत्रीत येतात व निर्माण होणा-या संघटनाद्वारे सुरू होतो संस्कृतीचा जागर.डोंबिवलीत असेच काहिसे झाले. सात वर्षापूर्वी एक मंडळ तयार झाले त्याचे नाव आहे ' कोकण युवा प्रतिष्ठाण ' .आता नावातच युवा असल्याने ते युवकांचेच आहे हे वेगळे सांगण्याची गरज आहे.तीशी चाळीशीतले हे तरूण आपल्या प्रिय कोकणातल्या संस्कृतीचा इथे जागर करीत असतात.
          एकेकाळी रात्रभर जागून भजनाच्या बा-या ऐकणारा कोकणी माणूस केवळ एक धार्मिक विधी म्हणून भजनाकडे पाहू लागलाय.करमणुकीच्या इतर माध्यमात जीव अडकल्यानं त्याच्या लेखी भजनाचं महत्त्व कमी झालंय.पण हेच भजन आयुष्यातील निराशेच्या काळात जगण्याचे बळ देते.हेच भजन अनेक नामवंत गायक,वादक यांच्यासाठी धूळपाठी ठरलेले आहे.रेल्वेतला दोन अडीच तासांचा गर्दीचा कंटाळवाणा प्रवास आनंदी करण्यासाठी हेच भजन अनेक तरूणांच्या आवडीचा विषय ठरले आहे.गाव खेड्यात माणसांचीच वाणवा तर भजन होणार कसे? अशा गर्तेत सापडलेल्या भजनाला लागलेली उतरती कळा आताच थांबवली पाहिजे हे कोकण युवा प्रतिष्ठाणच्या तरूणांच्या लक्षात येते आणि  त्यातूनच महिलांच्या व पुरूषांच्या भजन स्पर्धांचं आयोजन केलं जातं.स्पर्धेच्या दोन दिवसात सावंतवाडी ते अलिबाग,मुंबईतील भजनी मंडळे भाग घेतात.वेळेच्या मर्यादेमुळे प्रथम प्रवेश घेणा-या बावीस ते चोवीस मंडळांनाच संधी मिळते.विशेषत: तरूण मुलं मुली त्यामध्ये असतात ही कौतुकाची बाब आहे.
         भजनांच्या बक्षीस समारंभाच्या वेळी आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे समाज विकासात विविध क्षेत्रातील ज्या लोकांनी आपल्या अजोड कर्तृत्वाने हातभार लावलेला असतो अशांचा शोध घेऊन त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.कृतज्ञतेची भावना जपणारी ही युवा मंडळी आजच्या समाजासाठी कौतुकास्पद नाहीत काय? त्यांचे विचार,त्यांचे काम आणि सगळ्यांकडून होणारे त्यांचे कौतुक त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणतात.आज सहज वाट चुकून चुकीच्या मार्गाकडे मुले कधी वळतील हे सांगता येत नाही अशा वातावरणात कोकण युवा प्रतिष्ठाण ची ही मुले म्हणजे त्यांच्या आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा अखंड आनंद देणारी जगातली सर्वात मोठी श्रीमंती
आहे.ही संस्कारी तरूणाई ज्या समाजात आहे तो समाज नेहमीच आनंदी आणि  भयमूक्त असेल.अशी मुले प्रत्येकाला हवी असल्यास प्रत्येक पालकाने आपल्या मुलाने प्रथम माणूस बनले पाहिजे या दृष्टीनेच त्याला वाढवले पाहिजे,शिकविले पाहिजे.मी या तरूणाईचे कौतुक करतांना त्यांच्या आईवडिलांना साष्टांग नमस्कार करतो.

सुभाष लाड
९८६९१०७५३४