Tuesday, February 20, 2024

पुढच्या पिढीपर्यंत शिवराय पोहोचवायला हवेत!

          


         अवघ्या मराठ्यांचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज नाव घेतल्याशिवाय आपल्या मराठीपणाला साज चढत नाही.त्यांच्या नावाचा जयघोष केल्याशिवाय छातीचा बहारदारपणा खूलून येत नाही.शिवरायांच्या शौर्यकथा सांगितल्याबिगर शाहीरपण बहरत नाही. मराठी मातांना आपण जिजाऊच्या लेकी आहोत हे सांगतांना आपल्या मुलानं शिवाजीमहाराज छत्रपतींच पाईक होऊनच जगावं हे स्वप्न पडल्याशिवाय गोष्ट संपत नाही.गेली साडेतीनशे या देशावर एकच गारूड आहे "जय शिवाजी" आणि देशाभिमान दाखवणारी एकच आरोळी आहे " हर हर महादेव ".
           विविध कलांची निर्मिती करणाऱ्या या महाराष्ट्र भूमीत  ज्या कलेत शिवाजीराजांचं अस्तित्व आहे ती कला फोफावतांना दिसते.तो कलाकार नावारूपास येतो.त्याच्या आयुष्याचं सोनं होतं.मराठी नाटक तर यात अग्रणी आहे असंच म्हणावं लागेल.नुकताच पवई मध्ये  ऐतिहासिक खेळ झाला.नाटकाची वेळ रात्री आठची होती.चार फूट उंचीचा तीस नी तीस लांबी रूंदीचा रंगमंच उभारला गेला.बंद पडद्यामागे नेपथ्य मांडून झाले. शिवजयंतीच्या समितीचे कार्यकर्ते  पुढे शंभर खुर्च्या मांडून गप्प बसले होते. एवढेतरी प्रेक्षक आले तरी ऐतिहासिक नाटक लावल्याचा आनंद होईल असे म्हणत  रचंन ठेवलेल्या खुर्च्यांच्या ढिगारे बघत बसले.पहिली घंटा झाली. शंभर खुर्च्या भरल्या आता पुन्हा खुर्च्या मांडण्याची  लगबग सुरू झाली. तिसऱ्या घंटेचा आवाज आणि पाचशे खुर्च्यांच्या मागे उभ्या असलेल्या प्रेक्षकांचा गलका एकत्रित झाला.कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आणि मध्येच एखाद्या समजून घेणाऱ्यास उठायला लावून वृद्धांची महिलांची सोय करू लागले.महालक्ष्मी कलामंचचे कलाकार रंगमंचावर चढलेच होते.कुणीतरी कानात बोलले "मोठी गर्दी आहे".हा उत्साहवर्धक पण दबका आवाज एकेक सगळ्या कलाकारांचे कान तृप्त करता झाला.पेटीवर सूर वाजला आणि पूर्ण माहोल शांत झाला.
  "बहु असोत सुंदर संपन्न की महा" या भुतकाळातील नाट्य सृष्टीचे वैभव पाहिलेल्या नांदीने सगळ्यांचा ठाव घेतला.नांदीचे शब्द विरत जातांना प्रत्येक रंगकर्मीनी नटवर्य वंदन करून जणू काय ' सिमोल्लंघन ' करण्यास परत यायचे आहे अशा उत्साहात आनंदात विंगेत गेले.
          " सहर्ष सादर करीत आहोत  विद्याधर शिवणकर  लिखित आणि  प्रकाश लाड दिग्दर्शित दोन अंकी ऐतिहासिक नाटक ' वीर रत्न बाजीप्रभू ".नाटकाच्या नावाचा पुर्नउच्चार करतां करता पडदा वर गेला.ऐतिहासिक पार्श्वभूमीवर ऐतिहासिक पात्रांचा प्रवेश होताच सगळा प्रेक्षक ऐतिहासिक कालात गेला पण तरूणाईच्या तोंडातील शीळ त्यांना दाबून ठेवता आली नाही.कधी शांत तर कधी टाळ्या तर कधी यवनी भुमीकेबद्दलचा तिरस्कार चेहर्‍यावर व्यक्त करीत प्रेक्षक रंगून गेले.सव्वा नऊच्या दरम्यान मध्यांतरात प्रेक्षक घरी जातील.परत येतील की नाही शाश्वती नव्हती.पाच मिनिटात दुसर्‍या अंकाचा पडदा वर गेला.सगळा प्रेक्षक जाग्यावर होता.पहिल्या अंकात  माझी विठोजीची भूमिका असलेला प्रवेश पार पडतांना मला पहिल्याच टाळ्या मिळाल्या पण त्यात अडकलो नाही आणि लांब दूरवर काळोखात नजर टाकणे शक्य झालं नाही पण  आता विंगेतून पाहिलं तर बसलेल्या इतके प्रेक्षक उभे असल्याचं पाहिलं आणि मी नि:शब्द झालो.दुसर्‍या अंकांच्या शेवटच्या दृश्यात बाजीप्रभूंना घोडखिंडीत लढता लढता वीर मरण येते.त्यावेळचे त्याचे रौद्र रूप,रंगमंचावर त्वेषाने लढणं,शत्रूचे वार झेलून महाराज गडावर सुखरूप पोहोचल्याच्या तोफांच्या आवाज येईपर्यंत मृत्युलाही थांबायला लावणारी स्वामी निष्ठा विजयी ठरते.

           अवघा प्रेक्षक धन्य तो शिवाजी धन्य ते मावळे म्हणत डोळ्यांतल्या अश्रूंना वाट करून देताना पडदा पडला तरी उठण्याचे भान विसरून जातो तो आभाराचे दोन शब्द बोलण्यासाठी पुन्हा पडदा उघडला तरी बसूनच असतो.डोळे पुसतच कुणी खिशातले पाचशे,हजार,दोन हजार रुपये बक्षीस म्हणून पुढे करतो.पैसे, आभाराचे शब्द,मानाचा नारळ आणि अंगावर आलेली शाल जणू काही महाजांनी पाठवलेला नजरांना समजून तितक्याच अदबीनं तो मान स्विकारताना नाटकाचे सूत्रधार संजय मांडवकर कृतकृत्य झाल्याची अनुभूती घेत होते.ऐतिहासिक नाटकाची ताकद पवई च्या प्रेक्षकांनी दाखवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतांना प्रदीप रेवाळे भांबावून गेले.मी तरी काय बोलणार होतो.

          मी अकरावीत शिपोशी गावी असतांना 'शंभू राजे ' या एकांकिकेत औरंगजेबाची भुमिका केली होती. तेव्हा शिपोशीत ऐतिहासिक नाटकाचा कपडेपट नव्हता. आमच्या रिंगणे गाव नाटकात वेडे आहे. आमच्या वाडीत श्री हनुमान सेवा मंडळ  रिंगणे हे ऐतिहासिक नाटके त्याकाळात करीत असे.  मंडळाचा कपडेपटही होता. मी नाटकात असल्यामुळे कपडे,तलवारी असे पंचवीस - तीस किलो वजनाचा पेटारा माझा भाऊ पंढरी,विजय आत्माराम पेडणेकर व सुधाकर जयराम पेडणेकर या तिघांनी  डोक्यावर घेऊन डोलारखिंडीतील पायवाटेने तीस किमीचे अंतर पायी चालत आणला व नाटक संपल्यावर पुन्हा एवढे अंतर चालून परत नेला. आज चाळीस  वर्षांनंतर पुन्हा ऐतिहासिक नाटकात काम करण्याची संधी मिळाल्याच्या आनंदात होतो.तिथले मित्र मला भेटतात तेव्हा माझी ती आठवण सांगतात तेव्हा सुखावह वाटते.पवईत मी अडतीस वर्षे राहतो. त्यांना शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता किंवा लेखक-चित्रकार एवढीच माझी ओळख होती.आज या नाटकानं नाट्यकलाकार ही ओळख करून दिली.माझ्या मुलानं ( अॅड पंकज लाड )व मंडळातल्या त्याच्या मित्रांनी ऐतिहासिक नाटकाचा घाट घातला.संजय मांडवकरांनी प्रयोग घेतांना एक कलाकार रजेवर असल्यानं ती भूमिका मी करावी असा हट्ट धरला.माझ्या अडचणीमुळे माझ्या तालमीसाठी माझ्या सगळे कलाकार घरी आले.आणि इथल्या प्रेक्षकांनी माझ्या कामाचं कौतुक केलं.त्या सगळ्यांचाच मी ऋणी आहे.केवळ शिवाजी महाराज की जय करून चालणार नाही.तर शिवाजी जगायलाही हवंय.पुढच्या पिढीकडे शिवराय पोहोचवायलाही हवेत याची जाणीव झाली.
       "जय शिवराय "

सुभाष लाड
9869105734









Friday, February 16, 2024

देशावरून आले आणि कोकणचं भलं केले.

 

            



             देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि शिक्षण सार्वत्रिक करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या अगोदर ब्रिटिश राजवटीत 1940 च्या दशकात गावखेड्यात प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यात आले.त्यावेळी ज्या गावात दूरदृष्टीचे धुरीण होते त्यांनी गावातल्या देवळात तर कुठे मोठ्या चौसोपी घराच्या पडवीत तर कुठे मेतके,वासे,बांबू आणि टाळ्यांचा उपयोग करून कावण काढून शाळा सुरू केल्या. शिक्षकांची एवढी उपलब्धता नसल्याने सुरूवातीला गावातल्याच चारदोन बुकं शिकलेल्या माणसांनी त्यांच्यापरीने धुळाक्षरे गिरवण्याचे ज्ञान,बोटं मोजण्याचं कसब शिकवलं किंबहुना शाळेत जाऊन काही शिकायचं असतं हा सामाजिक संस्कार रूजविला त्यामुळे त्यानंतर काही दिवसांनी किंवा वर्षानी सरकारकडून आलेल्या शिक्षकासाठी वातावरण सुलभ झालेच पण मुका कपड्यात रानोमाळ हुंदडणाऱ्या  मुलांना काहीतरी ज्ञान मिळतंय याचं कौतुक वाटू लागले आणि या मुलांसाठी शाळा इमारत हवीशी वाटू लागली.मग कुणी जमीन दिली.कुणी झाडेमाडे दिली.कुणी वर्गणीदार पैसे किंवा धान्य विकून,श्रमदान करून  दगडी मातीची आणि छपरावर कुठे गवत शाकारून तर कुठे नळे वापरून शाळा इमारती उभारल्या.आमच्या रत्नागिरीतल्या शाळात देवगड सावंतवाडीकडील शिक्षक मंडळी येऊन प्राथमिक शिक्षणाला चांगला प्राप्त करून दिला.गावखेड्यात असलेल्या चौथीपर्यंत शिकून काही मुले ज्यांची घरची परिस्थिती बर्‍यापैकी असे ती तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी पहिलीत जाऊन व्ह.फा.म्हणजे व्हर्नाक्युलर फायनल होत.त्यातूनच कुणी मास्तर,लेखनिक नाहीतर मुंबईत नोकरी करण्यास जात.
         पुढे सातवी पर्यंतच्या शाळा गावात किमान एक निर्माण करण्यात आली. बरेच ग्रामस्थसुद्धा आपल्या मुलांना एवढं शिक्षण पुरेसं आहे या मानसिकतेतच असल्याने काही मुलांच्या पुढील शिक्षणासाठी मुंबईचा रस्ता अधिक सुखदायी वाटत होता. तिथे नोकरी करून शिक्षण घेण्याची संधी होती.कुणी लांबचा नातेवाईक सुद्धा जेवणाची खोलीबाहेर पथारी टाकून झोपण्याची सोय करीत असे.जवळचा नातेवाईक असेल तर हक्काने नातवाईकांच्या मुलांना आधार दिला आहे.आमच्या आणि आमच्या अगोदर जे कुणी मुंबईत आले त्यांनी त्या पद्धतीने दिवस काढले.त्या आधार देणाऱ्या चाकरमान्यांच्याप्रती सदैव कृतज्ञेची भावना असे.
         1960 च्या दशकात मुंबईतल्या चाकरमान्यांच्या एकत्र येण्यातून गावच्या विकासाबाबत चर्चा होऊन अनेक गाव मंडळे स्थापन झाली पुढे काही मंडळानी माध्यमिक शिक्षणाची सोय गावात करण्यासाठी पंचक्रोशीतील किंवा दशक्रोशीतील मंडळे,लोक एकत्र येऊन मध्यवर्ती  शिक्षण संस्था निर्माण करून आठवी पासूनच्या वर्गांची सुरूवात झाली पुढे त्या अकरावी किंवा दहावी पर्यंत शिक्षण देऊ लागल्या.सुरूवातीला त्यांचा वावर हा घराच्या ओसरीत किंवा देवळातच झाला. आणि पुढे पक्क्या इमारती.पण इथपर्यंतचा दैदीप्यमान इतिहास निर्माण करण्यात कोकणातल्या प्रत्येक शाळेचा पहिला शिक्षक हा देशावरचा होता हे कदापी विसरून चालणार नाही
          रिंगणे येथील मध्यवर्ती टेकडीवर आज शोभून दिसणारे शिक्षण संकुल आहे. त्यातील सरस्वती माध्यमिक विद्यामंदिर ची स्थापना  ही 1969 ची आहे.दिवाळीनंतर भात कापणी झाल्यानंतर बैलगाडीच्या वाहतुकीस सुरूवात व्हायची.अर्थात सगळा पावसाळ्यात पायवाटेशिवाय अन्य पर्यायच नव्हता. अनेक शिक्षक देशावरून यायचे काही दिवस किंवा महिने थांबायचे आणि निघून जायचे.सातत्याने शिक्षक भरतीच्या जाहिराती वर्तमान पत्रात दिल्या जायच्या. प्रभानवल्लीतील प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाच्या नजरेस ती जाहिरात नजरेस आली.दिवस पावसाळ्याचे होते.तिथल्या ग्रामस्थांकडून त्यानी अंतर आणि पायवाटेवरची गावांची नावे विचारून एका दिवसाचे कपडे व भाकरी एका पिशवीत टाकून ते मास्तर निघाले.कोर्ले,भांबेड पेठदेव,हर्दखळे अशी थोडी माळरानावरील वाट तुडवत हर्दखळे व रिंगणे गावच्या मध्ये पूर्व पश्चिम असलेल्या उंच डोंगरातील घाटवाटेने ते ईशापुर्ली या ठिकाणाहून उतरणीची वाट उतरून  तीनतासांची पायपीट करीत गर्दझाडीत विसावलेल्या केदारलींग मंदिराच्या पश्चिमेकडून वळसा घालून दगडी मातीच्या इंग्रजी सी आकाराच्या इमारतीच्या दरवाज्याच्या उजव्या बाजूला भिंतीवर लढणाऱ्या लाकडी फलकावर लिहिलेले 'सरस्वती माध्यमिक विद्या मंदिर रिंगणे ' हे वाचून पोहोचलो बाबा एकदाचा असा नि:श्वास  टाकला.गंगाराम दाजी हे शिपाई होते.त्यानी चौकशी करून शिक्षकांना बोलावून रूजवात करून दिली.त्यांना पाणी चहा दिली.त्यांनी आणलेली भाकरी खाल्ली. तोपर्यंत त्यावेळचे संस्था अध्यक्ष श्री.शांताराम तुकाराम आयरे आले.त्यांनी विचारले आणि मास्तर म्हणाले "मी एम.आर.ढेकळे,बी ए बी एड.राहणार निपाणी "
        गोल गुबर्‍या सावळ्या चेहर्‍यावर सदोदित  हास्याची लकेर असलेल्या ढेकळे सरांच्या भाषेत बेळगावी टच होता त्यातील मार्दवता कुणालाही आपलेपण दर्शवायची त्यात अगदी लहान मुलांनी अहो जाहो करून बोलण्याची पद्धत, त्यांच्यातील नम्रभाव ही सगळी वैशिष्ट्ये त्यांच्यात एकवटली होती.त्यातून आपण सहज संभाषण करतो आहोत अशी शिकवण्याच्या पद्धतीमुळेच ते मुलांमध्ये प्रिय होते तसेच संस्थेतल्या लोकांनाही ते आवडू लागले.आणि लवकरच ते सहशिक्षकाचे मुख्याध्यापक झाले.75 ची शेवटची अकरावीची तुकडी बाहेर पडली. दहावीच्या पहिल्याच तुकडीने सर्वांची निराशा केली.केवळ दोन टक्के निकाल लागला.ढेकळे सरांच्या पुढे शाळा टिकवण्याचे आव्हान होते.सरांनी सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन पुढील चांगला निकाल दिलाच पण आता शाळेकडे बाहेरगावचेही विद्यार्थी येऊ लागले.सरांनी विद्यार्थी वसतिगृहाची निर्मिती करून शाळेचा डंका सर्वदूर पोहोचवला. कोल्हापूरातूनही विद्यार्थी येऊ लागले.
मात्र राखीव जातीतले विद्यार्थीच मिळनासे झाले व ते वसतीगृह बंद पडले.
         या शाळातून शिकून शिक्षक म्हणून येईपर्यंत कोकणातील सर्व शाळांची मदार देशावरच्या शिक्षकांवरती होती.सगळेच शिक्षक इथे नोकरी करायला खुष होते अशातला भाग नाही पण अमुक विषयाचा शिक्षक आपणास आणावयाचा हे सरांनी ठरवलं की सर त्यात यशस्वी होतं. मुलांच नुकसान टाळावं ही त्यांची तळमळ होती.

अपूर्ण......

       सर,वार्धक्याने आपणातून निघून गेले असले तरी चांगल्या गुणांचं कौतुक करताना त्यांनी पाठीवर मारलेली थाप सदैव सोबत राहिल.

सुभाष लाड
9869105734


         
           

Monday, February 12, 2024

पुरस्कार पुलकित झाला.*

 


             आपलं कौतुक व्हावं ही प्रत्येक जीवाची आंतरिक अपेक्षा असते.लहान मुलानं नाच केल्यावर सर्वानी टाळ्या वाजविल्या की आपण काहीतरी वेगळं केलं आहे आणि ते सगळ्यांना आवडतंय हे त्या बालमनाला पुलकीत करते.मग आपण असंच काहीतरी काम करायला हवंय असं त्याला वाटतं राहातं.तो एक संस्कार असतो .पुढे त्या संस्कारातच ते मूल वाढत राहातं. निरागस मनाची झालेली ही मशागत मोठेपणी ती तशीच राहाते असं काही ठामपणे म्हणता येणार नाही. जसजसे मूल वाढत जाते तसतसे गुण - अवगुण त्याच्याभोवती पिंगा घालत असतात.त्यातलं काय घ्यायचं आणि काय दूर फेकायचं याचं भान प्रत्येकालाच असतं असं नाही.यासाठी घर, परिसर आणि शाळा इथल्या वातावरणाची महत्वाची भूमिका असते.आणि वातावरण कोणतेही असले तरी मुलांना नेमकं कोणत्या दिशेनं जाणे आवश्यक आहे याचं दर्शन त्याला त्यांच्या शिक्षकात होतं.कोणत्याही काळात किंवा  प्रदेशात शिक्षकाचं महत्व अधोरेखीत झाले आहे.म्हणुनच आजही शिक्षकाला समाजातल्या इतर कोणत्याही घटकापेक्षा अधिक मान असतो.
           प्रत्येक काळात अगोदरची पिढी नंतरच्या पिढीला आपल्या काळात शिक्षकांना कसे महत्व होते,शिक्षक कसे वागत होते याचं गुणगान गाते आणि आता कशी वाताहात झाली आहे दाखवून देते.पण प्रत्येक काळाची जीवन जगण्याची पद्धत बदलत असते त्याप्रमाणे शिक्षकाला बदलावे लागते हे समजून घेतांना आपल्या समोर असलेल्या मुलांना माणूस म्हणून जगण्यासाठीच आवश्यक ते पैलू पाडायचे असतात याचे शिक्षकाला भान असते.विद्यार्थ्याला एखाद्या विषयात कमी गुण मिळतात तेव्हा त्या विषयाची त्याची तयारी झाली नाही असे म्हणता येईल  पण एखादा विद्यार्थी बेशिस्त वागतो तेव्हा "तुला हेच शिकवलं का रे " असा आपसूक प्रश्न केला जातो तो त्याच्या शिक्षकासाठी असतो.
           मी गेली पंधरा वर्षे महेंद्र साळवी सरांच्या सहवासात आहे.त्याही अगोदरपासून त्यांच्या रूक्मिणी भास्कर विद्यालयाच्या दहावीच्या शंभर टक्के निकालाची कौतुकास्पद  कामगिरीबद्दल ऐकून होतोच.त्यात साळवीसरांच्या विषयाचा निकाल शंभर टक्के असणारच पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वरची श्रेणी मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी ते विशेष मेहनत घेत असतानाचे मी जवळून पाहिले आहे.ते इतरांसारखे एक विषय शिक्षक आहेत.त्यांना त्याचा चांगला पगारही मिळतो.पण ते पगारी शिक्षक नाहीत तर व्रतस्थी शिक्षक आहेत.त्यामुळेच हक्काच्या रजा आहेत त्या आपल्याला उपभोगण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून त्यांनी उगाच रजा कधी घेतल्या नाहीतच उलट सार्वजनिक सुट्टीतही त्यांनी मुलांना शाळेत बोलावून अधिकचे वर्गही ते स्वखुशीने घेत असतात. ते केवळ आपल्या विषयापुरते गंभीर नसून चित्रकलेत प्राविण्य दाखवणार्‍या मुलांसाठी चित्रकला शिक्षक होतात तर विज्ञान प्रदर्शनातही आपल्या मुलांच्या कल्पकतेला खतपाणी घालण्यासाठी आणि प्रदर्शनात त्यांना अव्वल बनविण्यासाठी ते जिवाचे रान करतात.एकदा तर त्यांनी मुलांच्या काव्य करण्याच्या कौशल्याला उत्तेजन देताना जवळ जवळ मुलांच्या दोनशे कवितांचे हस्तलिखित करून त्या मुलांना आनंद दिला होता.
           मला एकदा विचारण्यात आले होते की तुम्ही संघातर्फे आदर्श शिक्षकाचा पुरस्कार देता त्याचे निकष काय?त्यांना ऊत्तर देताना मी म्हणालो "जो शिक्षक मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करतो,मुलांना विविध उपक्रमात सहभागी करून त्यांच्यातील विविध कौशल्यांना विकसित करण्याचा प्रयत्न करतो,ज्या परिसरात त्याची शाळा असते त्या परिसरासाठी त्यांच्याकडील ज्ञानाचा उपयोग केला जातोय.ज्या शिक्षकांबद्दल समाजमनाचा कानोसा सकारात्मक असेल त्या शिक्षकाची निवड त्याच्या अपरोक्ष संघाची निवड समिती करीत असते."
नुकतेच आपण कोरोनाच्या संकटातून मुक्त झालो आहोत.त्याचा मुकाबला करतांना पोलीस,वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेविका यांच्याबरोबर शिक्षकही योद्धा बनून रणांगणात उतरले होते.साळवी सरांना ज्या गावाची जबाबदारी दिली होती ती पार पाडताना त्यांनी सर्व सहकाऱ्यांच्यापुढे अनोखा आदर्श निर्माण केला, गावकऱ्यांना ते आपले मित्र वाटले आणि त्यामुळे त्यांना सर्वांकडून सहकार्य मिळाले त्याचा परिणाम म्हणून त्या गावात एकही कोरोनामुळे मृत्यु झाला नाही. आजही त्या गावात साळवी सरांबद्दल आदर दाखवला जातो तो त्यांच्यासाठी पुरस्कार आहे.



           सर ज्या कामात उतरतात तेव्हा तन मन धन देण्याच्या तयारीत असतात.त्या कामाचे  नेतृत्व कोणाकडेही असो पण जबाबदारी आपल्याकडे आहे अशीच भावना ते ठेवतात तेव्हा ते राबतांना पुढे दिसतात  श्रेयाच्या वेळी मात्र स्वत:ला लांब ठेवतात. सर राजापूर -लांजा तालुका नागरिक संघाचे एक बिनीचे शिलेदार म्हणून काम पाहतात. त्यांच्या सारख्या अनेक प्रामाणिक व नि:स्वार्थी कार्यकर्त्यांची फळी त्यांनी संघासाठी उभी केली म्हणुनच अलिकडच्या काळात संघाकडून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जाताहेत त्यामुळेच संघ घराघरात पोहोचतो आहे.याचबरोबर ते त्यांच्या वेरळ गावच्या विकासासाठी झटत आहेत. शिक्षक संघटनेतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.जिथे जाईल तिथे माणसं जोडणारा हा माणूस आपल्या एकत्र कुटुंबातही तितक्याच आनंदात रमलेला आहे.ते त्यांच्या कुटुंबात मोठे आहेत की छोटे आहेत हे मला माहित नाही  पण त्या कुटुंबात अधिक प्रेमभाव वाढावा यासाठी ते करीत असलेला विचार आजच्या भरकटत चाललेल्या समाजव्यवस्थेत आदर्श ठरणारा आहे.
            सर्वांच्या मदतीसाठी सदैव तयार असणारा, नेहमीच हसतमुख चेहर्‍यानं वावरणारा,मोजकेच पण लाख पते की बात करणारा,काही केल्याचा बडेजावच काय पण प्रसिद्धीपासून चार हात दूर असलेला हा माणूस स्वत:ला शिक्षक म्हणवून घेण्यात आणि तसेच जगण्यास अधिक महत्व देतो म्हणूनच सार्वजनिक जीवनात भले त्यांचा वावर असेल पण प्रथम प्राधान्य आपल्या शाळेला अर्थात आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांनाच ते देत असतात.  शिमग्याच्या दिवसांत कोकणात एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहत असतो.मोठ्या संख्येनं चाकरमानी दारात येणाऱ्या पालखीची पुजा करण्यासाठी सुट्टी नाही मिळाली तर दांडी मारून येतात. अर्थात आबालवृद्ध ग्रामस्थही तेवढेच उत्साही असतात.साळवी सरही आपल्या मुलांना,पत्नीला घेऊन घरी जातात.सगळा बेत आखतात पण गेल्या कित्येक वर्षात सरांच्या घरी पालखी आलेली असते.सगळे कुटुंब त्या सोहळ्यात मग्न असते आणि साळवी सर मात्र दहावीच्या परीक्षेच्या वर्ग खोलीत पर्यवेक्षण करीत असतात. घरी आलेला देव घरच्यांसाठी शुभाशीर्वाद देत असताना साळवी सर विद्यार्थीरूपी देवाची सेवा करीत असतात आणि म्हणूनच कधी तरी अचानक एखादा आवाज येतो
" सर,ओळखलंत का मला?.मी अमूक अमूक,अमूक वर्षी दहावी झालो."
सर थांबतात,त्याची आस्थेने विचारपूस करतात. त्याचा नमस्कार घेतात आणि त्याचं छान चाललं आहे एवढ्या एका वाक्यानं भरून पावल्याचं समाधान घेऊन पुढे निघतात. खरं म्हटलं तर हाच शिक्षकाचा पुरस्कार असतो. अशा अनेक पुरस्कारांचे धनी असलेल्या महेंद्र साळवी सरांना आज हर्चे येथील आदर्श ठरलेल्या नाथ पै विद्यालयाच्या सभागृहात आज सरांना जेव्हा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्रदान केला गेला तेव्हा त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांना व सरांच्या हजारो चाहत्यांना आनंद झालाच पण पुरस्कारही योग्य माणसाकडे गेल्याने पुलकीत झाला.

सुभाष लाड
9869105734



           

Sunday, February 4, 2024

माणूस म्हणुन जगण्यासाठी

 


           घरात अठराविश्व दारिद्र्य असले तरी घरी आलेल्या पाहुण्याला त्याच्या पाहूणचारात कुठेही उणीव भासणार नाही ही कोकणची संस्कृती. असेच एकदा घरी पाहुणे आले.घरच्या स्त्रीने त्यांना गोड शिरा करून देण्याचा बेत ठरविला. घरात काही नव्हतेच.तिने मुलाच्या हातात पिशवी व जिन्नस लिहिलेली चिठ्ठी देऊन नेहमीच्या वाण्याकडे पाठवले.वाण्याने वस्तू पिशवीत भरल्या.मुलाकडे पिशवी देता देता तो म्हणाला     " पैसे  ? "             

 " तुम्ही लिहून ठेवा,आई नंतर देईल" 

मुलाचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच

 " दोन महिने झाले अजुन एकही पैसा दिलेला नाहीय. आता उधारी मिळणार नाही." 

असं बोलून दुकानदाराने भरलेल्या वस्तू काढून घेतल्या,रिकामी पिशवी त्या मुलाच्या हातात दिली.मुलाच्या डोळ्यांत टचकन पाणी जमले.खाली मान घालून तो घरी गेला.मुलाच्या हातातली रिकामी पिशवी पाहून आई  काय समजायचे ते समजून गेली. बालवयात अनुभवलेल्या प्रसंगाने आपली आर्थिक परिस्थिती बदलायची असा विचार त्या मुलाच्या मनात दृढ झाला.घरी आलेल्या पाहुण्याला आपण मनासारखं देऊ शकलो नाही हे त्या कुटूंबाला अपमानजनक होते.

            त्या दिवशी ठाण्यातल्या एका कार्यालयात पोहोचलो. साहेबांना भेटायचं आहे असं सांगितलं.
"साहेबांशी बोलणं झालंय का ?"
 हसर्‍या चेहर्‍यानं आलेल्या समोरच्या प्रश्नाला
 " होय "
 असं उत्तर देताच
" बसा ना सर  ! " 
असं आपलेपणाचं बोलणं ऐकून तिथल्या मऊशार सोफ्यावर बसलो.तीन मजले चढून आल्यानं जरा दमल्यासारखं वाटलं होतं. पाणी हवं असल्याचं जाणवलं.तेवढ्यात
 " बाहेर एक ग्लास पाणी आण." असा फोनवर आवाज आला. पुढच्या काही मिनीटात शुभ्र ग्लास ट्रे मधून पुढे आला. पाणी पिऊन ग्लास खाली ठेवला.
" सर काॅफी घेणार की चहा ?"
मी काॅफी म्हटलं आणि समोरच्या तिपाईवर ठेवलेल्या पुस्तकात रमलो.
"सर नाव काय सांगू सरांना?"
" सुभाष लाड"
हा फोन साहेबांसाठी असणार असं समजून मी पुन्हा पुस्तकात शिरलो.तेवढ्यात काॅफी आली. काॅफीचे घोट घेतांना डोळ्यांसमोर     ' आईच्या आज्ञेचं पालन करीत चिठ्ठी व पिशवी  घेऊन वाण्याकडे जाणारा तो अधीर मुलगा,उधारी थकल्याने भरलेला जिन्नस परत काढून घेणारा व्यावहारिक वाणी , पुन्हा रिकामी पिशवी घेऊन माघारी जाणारा तो अपमानीत मुलगा,घरी आलेल्याचा  योग्य पाहुणचार करता आला नाही याची बोच सहन करणाऱ्यां घरंदाज व संस्कारी आईचा निराश चेहरा हे सगळं मला आठवत होतं.कारण त्याच मुलानं त्यावेळेला  कष्ट करून आपली आर्थिक परिस्थिती बदलायची असा  दृढ निश्चय केला होता.आणि पुढे त्याने तो पूर्णत्वास नेलेला होता.मराठी उद्योग समूहात त्यांचं नाव गेली कित्येक वर्षे आदरानं घेतलं जातंय. शून्यातून सुरूवात केली नी आज करोडोंची ऊलाढाल करताहेत. हजारो लोकांचे संसार फूलवण्याचं काम करताहेत. स्वतः मात्र सामान्य माणूस राहून जगतांना घरी आलेल्या प्रत्येकाचा आदरपूर्वक पाहूणचार करतातच पण त्यांच्या कार्यालयातही त्या पाहुणचारात कुठे कमी राहणार नाही याची काळजी घेतात हे पाहून त्यांच्या बद्दलचा आदर अधिक वाढतो. त्या काॅफीने मी सुखावलो.
           तसं पाहिलं तर त्यांची नी माझी ही पहिली भेट नव्हती.गेल्या वर्षभरात गावाकडे आम्ही दोन तीनदा गप्पा मारल्या.गावचं घरपण जपणाऱ्या त्यांच्या घरातही सुखद सहवास लाभला पण पहिली भेट शिवाजी मंदिरच्या मॅजेस्टिक मध्ये झाली ती २०१८मध्ये. नेहमीप्रमाणे मी काही पुस्तके निवडताना एका पुस्तकावरच्या हसर्‍या चेहऱ्यानं लक्ष वेधलं. पुस्तकाचं नाव 
' मी कोण ?' 
.त्याच चंदेरी रंगात चरित्र नायकाचं नाव होतं श्री.रवींद्र प्रभुदेसाई. कोपर्‍यात असलेल्या पितांबरी या नावानं मात्र मला भुरळ घातली कारण पितांबरीवाले आमच्या जवळच्याच तळवडे गावचे हे मी ऐकून होतो.घरी जेव्हा केव्हा पितांबरी आणली जायची तेव्हा मी अभिमानाने बायकोला सांगायचो.ही आमच्या गावच्या माणसाच्या कारखान्यात तयार होते.मला माझ्या गावाकडच्या माणसांबद्दलचे अप्रूप नेहमीच वाटत असल्यानं मी ते पुस्तक घेतलं.त्या रात्री वाचून काढलं. आपल्या मातीतला एक उद्योजक जाणून घ्यावा एवढ्याच अपेक्षेनं मी पुस्तक घेतलं पण पुस्तक वाचल्यानंतर केवळ उद्योजक नाही तर माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शक ठरावं अस हे चरित्र आहे असं मला वाटलं.मला आवडलेलं पुस्तक माझे मित्र विजय हटकर यांना वाचावयास सांगत असतो.यावेळेला मी पुस्तकच त्यांना दिलं आणि पुन्हा मॅजेस्टिक मधून आणखी एक पुस्तक खरेदी केलं.त्याच्यावरचे वेस्टन न काढताच कधीतरी साहेबांची भेट होईल तेव्हा त्यावर त्यांची सही घेताना ते वेस्टन काढायचे असं ठरवून ते पुस्तक ठेवलं होतं.


        या वर्षी संघाचं नववं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन शिपोशीला होणार आहे.त्यावेळेस निघणाऱ्या ग्रंथदिंडीतल्या पालखीत  स्थानिक  लेखकांची पुस्तके ठेवण्याच्या रिवाजाप्रमाणे ते ठेवले जाईल.साहेब तर संमेलनाचे उद्घाटक आहेत.म्हणून पुस्तकावर सही घेण्याच्या निमित्ताने मी त्यांच्या कार्यालयात गेलो. थोड्या वेळानंतर गणेश चव्हाण आले.गावाकडच्या गप्पांनी वेळेचे भानही राहिले नाही.आजच्या भेटीने तर साहेबांचे जन्मभूमीवर किती निरलस प्रेम आहे हे दिसून आले.
          वयाच्या एकविसाव्या वर्षी व्यवसायातील चढउतार गाठीशी घेऊन पुन्हा नव्या दमात उभे राहून तांब्या पितळेची भांडी लख्ख करणारी पावडर सुरूवातीला आपल्या परिचितांस मोफत देऊन त्यांचा सकारात्मक अभिप्राय मिळाल्या नंतर  त्या पावडरचे नाव  त्याच बरोबर उद्योगाचे नाव  'पितांबरी ' ठेवले.डाॅक्टर जशी गोळ्यांची पुडी बांधतो तशा कागदाच्या पुडीतून सुरू झालेला  'पितांबरीचा ' प्रवास पुढे आकर्षक आवरणातून  ठाणे मुंबईत लौकिक  प्राप्त करता झाला.पण देश विदेशातही पितांबरीची मागणी वाढली.हे कसं घडलं हे जाणून घ्यायलाच हवंय पण  पुढे स्वत:च्याच उत्पादनांचे डिपार्टमेंटल दुकान थाटण्याइतक्या दर्जेदार उत्पादनांचं गूपीत काय ? शेती व पर्यटन क्षेत्रात मुशाफिरी करतांना आपल्या ' तळवडे ' या जन्मभूमीला जगाच्या नकाशावर आणतांना इथल्या हजारो तरूणांना रोजगार उपलब्ध करून लाखोंचा पोशिंदा होऊनही त्याच गावच्या सामान्य  महिलेच्या  चवदार हातून  तयार झालेली  'पातोळी ' खातांना स्वर्ग सुखाची अनुभूती घेणारे पितांबरीकार एवढे जमिनीवर कसे वावरतात याचा शोध घ्यायचा असल्यास सौ.श्वेता गानू यांनी लिहिलेले ' मी कोण ' हे पुस्तक आवर्जून वाचायला हवंय.
         तूर्तास साहेबांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देतांना
त्यांचे आवडते सुभाषित म्हणतो.
       सूतो वा सूत पुत्रो वा यावा कोsवा भवाम्यहम् 
       दैवायत्तं कुले जन्म: मदायत्तं तु पौरुषमं


सुभाष लाड 
४/२/२०२४

९८६९१०५७३४