परवा पाचलहून किशोर भाई नारकरांचा फोन येऊन गेला. संघाचे हितचिंतक संजयजी सुतार यांच्या वडिलांचे निधन झाले हे सांगण्यासाठी त्यांचा फोन होता. राजापूर तळवडे येथे संपन्न झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संजय सुतार यांच्या मूर गावच्या घरी माझे वरचेवर जाणे येणे होत असे. नव्वदी पार केलेले संजय सुतार यांचे वडील घराच्या ओटीवरच्या आराम खुर्चीत पहुडलेले असत. हसतमुख चेहऱ्याने स्वागत करताना आपण कोण कुठून कशासाठी आलात याची ते आस्थेवाईकपणे चौकशी करता करता स्वयंपाक घराकडे आवाज देऊन पाहुण्यांच्या चहापाण्याच्या व्यवस्था लावत असत. हळूहळू परिचय वाढत गेला आणि आमच्या गप्पा ही वाढू लागल्या. त्यांच्या गप्पा म्हणजे गेल्या नव्वद वर्षांचा इतिहास त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळत असे त्यामुळे मिळंदला माझ्या मुलीकडे जाताना सुद्धा मी थोडा वेळ काढून त्यांच्याकडे जात असे. गणपती उत्सवाच्या नंतर मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो मात्र रात्र फार झाली होती आणि त्यांची ही तब्येत थोडी नाजूक वाटत असल्याने ते आराम करत होते त्यामुळे ती भेट काही होऊ शकली नाही याची मनाला खंत लागून गेली.
वयाची शंभरी पार करतील अशा प्रकारची प्रकृती असलेले मूर गावचे कर्मयोगी सीताराम कृष्णा सुतार यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते पण त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज, स्पष्ट बोलणे यात बदल जाणवत नव्हता त्यामुळे २४ नोव्हेंबरच्या सकाळी नेहमीप्रमाणे चहापान करून ते जिथे बसले तिथेच त्यांनी समाधानाने अलगदपणे डोळे मिटले. त्यांचा मृत्यू कर्मयोग्याला साजेसा होता. वारकरी संप्रदायातील लोकांच्यासाठी प्रसिद्ध असलेले बुवा सुतार व उभ्या परिसरातील लोकांना आपले आबा सुतार गेल्याचे दु:ख झाले.म्हणुनच त्यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती.
आबांचा जन्म सुतार घराण्यात झाला असल्याने उपजतच सुतारकला त्यांच्याकडे होती.ते जन्मले त्याकाळात सुतारांना गावातल्या शेतकऱ्यांना सुतार कामाची सेवा द्यावी लागत असे. त्याबद्दल सुतारांना शेतकऱ्यांकडून धान्य मिळत असे. ती कुळ पद्धती त्यावेळेला अस्तित्वात होती. आपण एका मोठ्या कुटुंबात जन्मलेलो असल्याने एवढ्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ करताना आपण कुळांच्या कामावर अवलंबून राहिलो तर आपल्याला प्रगती साधता येणार नाही आणि म्हणून वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि स्वतंत्रपणे मुंबई,ठाणे, पालघर अशा दूर भागामध्ये सुतारकाम करायला सुरुवात केली. विश्वकर्माचा वरदस्त असलेल्या आबांच्या हातात लक्ष्मी आणि मुखात सरस्वती असल्याने आबांचा लोकसंग्रहही तितकाच दांडगा होता.पालघरचे तत्कालीन खासदार शांताराम घोलप यांच्याशी त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते.
(मूर गावातील श्री काळेश्वर विद्यालय या विद्यालयाच्या निर्मितीत आबा सुतार यचा मोठा सहभाग होता.)
उमेदीची पन्नास वर्षे दूरच्या प्रदेशात राहिल्यामुळे आबांना बारा गावचे पाणी चाखता आले होते. ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या शिदोरीत बरीचशी भर पडली होती. बऱ्यापैकी पैसा कमावल्यामुळे घरची परिस्थितीतही आता बदल जाणवायला लागला होता. आबांना आता गावाकडचे वेध लागले. आबांनी गावाकडे काम करायला सुरुवात केली.आबांसोबत काम करणारे पाच पंचवीस कारागीर असल्याने ते मोठ मोठ्या घरांची आणि देवळांची कामे घेत. कामातील प्रामाणिकपणा, दर्जेदारपणा आणि दिलेल्या वायद्याचे भान ठेवून काम करणाऱ्या आबांना लांबलांबची कामे मिळत गेली.आजही वेगवेगळ्या ठिकाणच्या वास्तू आबांच्या कलात्मकतेची साक्ष देत उभ्या आहेत.
( सुतारवाडीतील मुलांच्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.५ च्या निर्मितीत आबांचा पुढाकार होता.)
आधी प्रपंच करावा नेटका ।
मग द्यावे परमार्थ विवेका ।।
प्रपंच सोडून परमार्थ कराल ।
तेणे तुम्ही दुःखी व्हाल ।।
प्रपंच सांडून परमार्थ केला ।
तरी अन्न मिळेना खायला ।।
मग तया करंट्याला ।
परमार्थ कैसा ?
आबांच्या जीवन शैलीचा विचार करतांना त्यांच्यावरची साधू संतांच्या विचारसरणीचा मोठा पगडा असलेला दिसतो. त्याकाळात घर भरून मुलांची संख्या असायची.आबांना तीन मुलगे आणि पाच मुली पण त्यांचा त्यांना कधी भार वाटला नाही. उलट गावातच राहिल्यामुळे त्यांच्या सर्व मुलांचे योग्य तऱ्हेने त्यांना शिक्षण करता आले.मुलींना आवश्यक ते संस्कार आणि जगण्याचे धडे देऊन योग्य वेळी त्यांना संसार मार्गावर सोडले.तीनही मुलांनी गावातच राहून त्यांचं त्यांनी आयुष्य जगावं या दृष्टीने त्यांना शिक्षण दिले, घरच्या व्यवसायाचे धडे देतांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळवून दिला, सामाजिक बांधिलकीचे बंधन दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं माणूस म्हणून जगण्याचं बाळकडू कोळून दिल्याने त्यांची तीनही मुलं स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तुत्वाने समाजात एक आदराचे स्थान निर्माण करू शकली एवढेच काय पण आबांनी त्यांच्याही मुलांना अर्थात नातवांना उच्च शिक्षण देऊन कुणी डॉक्टर कुणी इंजिनियर कुणी व्यावसायिक होऊन तिसरी पिढी स्वावलंबी होऊन मार्गस्थ होताना पाहिली म्हणूनच एक यशस्वी बाप म्हणून तसेच एक कृतकृत्य आजोबा म्हणून जगताना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती तेज झळकत होते.
( आबांनी गावातील वारकऱ्यांच्या साठी श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बांधकामात पुढाकार घेतला. येथील मूर्ती पंढरपुराहून आणलेली आहे.)
आबांनी त्यांच्या वाट्यास आलेल्या प्रत्येक नात्याला न्याय दिला.ते एक आदर्श पुत्र होते म्हणून ते आपल्या मुलांना आदर्श पुत्र बनवू शकले.ते आदर्श भाऊ होते म्हणुनच त्यांची मुले हृदयास हृदय देऊन एकत्र कुटुंबात आनंदाने राहात आहेत. त्यांनी पती होऊन आपल्या पत्नीला योग्य तो आदर सन्मान दिला. तोच संस्कार मुलांपर्यंत आला त्यामुळे त्यांच्या सुनांनी या घराला हसऱ्या खेळत्या गोकुळाचे स्वरूप दिले. कुटुंबप्रमुख होणे सोपी गोष्ट नाही. कुटुंबप्रमुखाला सर्वात प्रथम कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मार्ग प्रशस्त करावा लागतो. घरात भरून आणलेली पाण्याची घागर ही त्याच दिवशी रिकामी होते त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी सुद्धा भरून आणावी लागते याचे भान कुटुंबप्रमुखाला असावे लागते आणि म्हणून प्रथम त्याने श्रम प्रतिष्ठेला महत्त्व द्यावे लागते तरच कुटुंबातील माणसं त्याला मदत करायला हाताशी येतात. कुटुंबप्रमुखाला प्रत्येकाचे श्रम कौशल्य माहीत असावे लागते. त्या श्रम कौशल्याला योग्य ते स्वातंत्र्य दिले तरच त्या श्रमाला आकार येतो. कुटुंबप्रमुख हा त्या कुटुंबाचा राजाच असतो परंतु ते राजेपण रयतेनं स्वतःहून दिलं पाहिजे त्यासाठी कुटुंबप्रमुखाला प्रत्येक सदस्याला प्रेम आदर देताना त्यांचीही करंगळी या संसाररुपी गोवर्धनाला उचलण्यासाठी आवश्यक आहे याची जाणीव ठेवून त्याचे महत्त्व अधोरेखित करावे लागते त्यावेळेला त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला हे कुटुंब माझे आहे ही जाणीव प्रोत्साहित करते व तो कुटुंबाशी अधिक जोडला जातो.
( कर्त्या पुरुषाचा प्रेमळ धाक कुटुंबावर असेल तर कुटुंब गुण्या गोविंद्याने नांदते. आबांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुटुंबाने प्रेमच दिले.)
एकत्रित कुटुंब पद्धतीचे महत्त्व कोकणा इतके जगाच्या पाठीवर कुणालाही कळले नाही.मात्र एकत्र कुटुंबाची मर्यादा कुठपर्यंत असावी याचे भान कोकणाला असल्याचे क्वचित ठिकाणी जाणवते. इथली संयुक्त कुटुंबे अचानक विभक्त होताना दिसतात तेव्हा वादविवाद आणि कटुता निर्माण झालेली दिसते. आबा सुद्धा अशा संयुक्त कुटुंबातून आपल्या कुटुंबाला घेऊन बाहेर आले मात्र ज्या कुटुंबात आपण वाढलो घडलो त्या कुटुंबाशी तेवढ्याच सलगीने, प्रेमाने आपण का विभक्त व्हायचे याची चर्चा करून कोणतीही कटूता न ठेवता सर्व संमतीने ते बाहेर पडले. व्यावहारिक दृष्टिकोनातून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे आकाश त्याला देण्याची आवश्यकता असते. एकाच घरात दोन चुली मांडण्यापेक्षा स्वतंत्र घरात चूल मांडून त्यांचे त्यांना जगण्याची संधी दिली तर त्यांच्या कर्तृत्वाला ही जागा मिळते आणि दोन्ही घरातली ताकद ही अबाधित राहते. आपले पारंपारिक घर आबांनी आपल्या बंधूंना सपूर्द करून गुरांचा गोठा असलेल्या जागेत आपल्या कुटुंबासाठी नवे घर बांधले आणि त्या ठिकाणी एका नवीन सृष्टीची त्यांनी निर्मिती केली. चौतीस वर्षांपूर्वी एका टेकडीवर बांधलेल्या आबांच्या घरात केवळ आबांचीच मुले मोठी झाली नाही तर त्यांनी आपल्या भावांच्या मुलांना सुद्धा त्यांनी त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी या घरातून प्रेम आपुलकी दिली.
( मूरगाव ची ग्रामपंचायतीची इमारत)
आबांची दोन मुलं दोन दोन वेळा मूरगावच्या ग्रामपंचायतीच्य सरपंच पदी बसली. त्यांच्या एका सुनेला रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे जरी त्यांचे कर्तृत्व असले तरी एक पार्श्वभूमी म्हणून आबांनी केलेल्या गावातल्या विकास कामांचं मोठं योगदान कारणीभूत होतं. सुतार कुटुंबाची सामाजिक कार्याबद्दलची ओढ अधोरेखित करतांना १९५५-५६ च्या दरम्यान मूर खिंड तोडून तिथे श्रमदानातून रस्ता करण्याचे साने गुरुजींच्या प्रेरणे सुरू झालेल्या राष्ट्र सेवा दलाच्या श्रमसंस्कार शिबिरातून झाले.
ज्येष्ठ साहित्यिक ना.ग.गोरे यांच्यासारख्या महनीय व्यक्ती त्यात सहभागी होत्या. ह्या शिबिरार्थींच्या बरोबर गावातले काही हात त्या कामाला लागले त्यातील एक हात आबा सुतारांचा होता.
*' तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून
उद्या पिकेल सोन्याच रान
चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार
तुला नव्या जगाची आण '*
वसंत बापटांच्या या गाण्याचा जन्म याच खिंडीतल्या श्रमसंस्कार शिबिरात झालेला आहे.
मूर गावात पोस्टाची सुविधा आणतांना आबांनी आपल्या घरातील जागा उपलब्ध करून दिली. आपल्या वाडीवस्तीवरील लहान मुलांना प्राथमिक शाळेत जाण्यासाठी फार दूरवर जावे लागते याची जाणीव ठेवून आबांनी आपल्या वाडीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.५ ची मागणी केली. शाळेला मंजुरी मिळाली परंतु इमारत बांधणं सहज शक्य नव्हतं त्यामुळे इमारत उभी राहीपर्यंत चार वर्षे आबांनी आपल्या घरात प्राथमिक शाळा भरवली. पुढे इमारत बांधल्यानंतर या शाळेची प्रगती गावाला नावलौकिक देऊन गेली त्या शाळेला आदर्श प्राथमिक शाळा असे संबोधण्यात येते. गावातल्या मुलांना सातवी नंतरच्या पुढच्या शिक्षणासाठी पाचल पर्यंत जावे लागे. त्याही पलीकडील काजीर्डा, वाळवड सारख्या गावातील मुलांना ते अधिक अंतर होते. मूर गावात हायस्कूलची निर्मिती करावी हा पहिला विचार मांडणाऱ्यांमध्ये आबा सुतार अग्रेसर होते. सर्व गावकऱ्यांच्या प्रयत्नाने १९८०/८१ साली मूर पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे हायस्कूल सुरू झाले आणि अनेक मुलांची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबली. मूर व वाळवड येथील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मूर वाळवड सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. आबांनी त्या सोसायटीचे चेअरमन पद भुषवले आहे.सात्विक स्वभावाच्या आबांचा अध्यात्मिकतेकडे प्रचंड ओढा होता.संसाराच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त होतांना आबां आता आपला वेळ वारकरी संप्रदायासाठी व्यतित करू लागले. गावातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना घेऊन पंढरीची वारी करू लागले आणि अशातूनच केशव गुरवांच्या आजोबांना घेऊन गावामध्ये श्री विठ्ठल रुखुमाई चे मंदिर बांधून पंढरपुरातून मुर्त्या आणून बसवल्या व त्याच वर्षापासून हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. आज मोठा वर्ग वारकरी संप्रदायात एकवटलेला आहे. मूर गावच्या परिसरातील अनेक भाविक श्रद्धेने या मंदिरात येतात इथल्या हरिनाम सप्ताहात सहभागी होतात. दूर दूर चे किर्तनकार, प्रवचनकार, विणेकरी, मृदुंगमणी, गायक, धरकरी अशी अनेक प्रकारची मंडळी इथल्या हरिनाम सप्ताहाचा आनंद घेत असतात. गावाला तेव्हा उत्सवाचे स्वरूप आलेले असते.
पत्नी सुलोचना, मुले रामचंद्र, भास्कर व संजय, सुना ,नातवंडे, पणतवंडे तशीच भावाची मुले, सुना, नातवंडे, याचबरोबर मुली आणि त्यायोगाने जोडलेले अनेक नातेवाईक, मित्रपरिवार असे मोठे नांदते गोकुळ मागे ठेवून जाताना आबा थोडेही विचलित झाले नाहीत. या पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर जे कर्म आणि कर्तव्य करावी लागतात ते सर्व काही आबांनी आनंदाने पूर्ण केले होते. माणूस म्हणून जगण्याचे दिलेले संस्कार त्यांच्या पुढच्या पिढीत संस्कारीत झाले आहेत याची त्यांना खात्री झाली होती त्यामुळेच त्यांनी निश्चिंतपणे हे जग सोडले.
अवघीच तीर्थे घडली एक वेळा l
चंद्रभागा डोळा देखिलिया ll
अवघीच पापे गेली दिगंतरी l
वैकुंठ पंढरी देखिलिया ll
अवघिया संता एक वेळा भेटी l
पुंडलिक दृष्टी देखिलिया ll
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक l
विठ्ठलची एक देखिलिया ll
त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात हाच अभंग रुंजी घालत होता. त्यांच्याच खांद्यावरुन जन्मा आल्याचे सार्थक प्रसन्न चेहऱ्यावर घेऊन कर्मयोगी आबा सुतार अर्थात ह.भ. प. सिताराम कृष्णा सुतार वैकुंठीचा प्रवास करत होते.
*सुभाष लाड*
अध्यक्ष
राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
'कोकण मीडिया' या सुप्रसिद्ध साप्ताहिकाने अण्णांचा श्रद्धांजलीपर लेख प्रकाशित केला.
अभिप्राय ---------
डॉ.विजयालक्ष्मी देवगोजी,
आपण लिहिलेली श्रमजीवी काशिनाथ चव्हाण व कर्मयोगी आबा सुतार यांची व्यक्तिचित्रणे व हनुमान मंदिर विषयीच्या अत्यंत सुखद अशा आठवणी वाचल्या . या दोघा व्यक्तींविषयी आपल्या मनात किती आदराची भावना आहे हे शब्दाशब्दातून प्रतीत होते. यांचे कार्यही तेवढेच महान आहे. आपल्या लेखनातून त्यांचे संपूर्ण उत्तुंग असे व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते. अशा व्यक्ती समाजात असल्यामुळेच एखाद्या गावाचा किंवा समाजाचा विकास आणि भरभराट होत असते. काशिनाथ चव्हाण यांनी वाचनालयासाठी घेतलेल्या निर्णयावरूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची संपूर्ण ओळख व्हावी. विद्यालय असो वा मंदिर किंवा गावाच्या प्रगतीसाठी
आबांनी जे कार्य केले त्याला कुठेही तोड नाही. आपल्या शब्दसुमनाने या दोघांच्याही व्यक्तिमत्त्वाला आपण अत्यंत आदराची मानवंदना दिलीत, ब्लॉकच्या रूपात ही व्यक्तिमत्वे आपण सर्वदूर पोहोचवलीत हे आपलेही कार्य अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.
आपले गाव तेथील आमची मंदिरे हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मर्मबंधाची तील ठेवच असते हनुमान मंदिराच्या परिसरा भोवतीचा निसर्ग, इतिहास आणि अनेक आठवणी यामुळे स्मरणरंजन होऊन प्रत्येक वाचकाच्या मनात देखील त्याच्या आठवणीत दडलेल्या अनेक सुखद स्मृती जाग्या होतात.
अत्यंत वाचनीय असे तीनही ब्लॉग.
विठ्ठल कुसाळे,
एका कर्मयोग्याचे दुसऱ्या कर्मयोग्याने शब्दबद्ध केलेले भावस्पर्शी, हृदयस्पर्शी शब्दांकन!....... 🙏🙏