Sunday, March 31, 2024

भगिरथाचा पुत्र श्री वासुदेव घाग!

 


            ओणी मार्गे पाचलला जाताना सौंदळला घागवाडीत थोडी वाट वाकडी करणे हे आता आमच्यासाठी नित्याचेच झालंय. माजी सैनिक श्री वासुदेव घाग हे नाव आता लांजा राजापूर परिसरात सर्वश्रुत झाले आहे ते एक प्रगतीशील शेतकरी म्हणून. तसं पाहिलं असता सैन्यातून सेवानिवृत्ती घेतल्यावर सर्वजण सरकारी कोट्यातील नोकरी मिळवून शक्यतो मुंबईत स्थावर होतात.घागांच्या बरोबर ज्यांना सेवानिवृत्ती मिळाली त्या सर्वांनी तोच मार्ग निवडला पण घाग सेवानिवृत्त झाले आणि मुंबईतल्या खोलीला गिर्‍हाईक मिळवले.खोली विक्री होताच ते आपल्या सौंदळ गावी आले.आपली वडिलोपार्जित जमीन कसू लागले.जमिनीत काही पिकत नाही.पिकलं तर जनावरं ठेवत नाही म्हणून शेती मोडून रेशनिंगवरच्या धान्यावर जगणारे घागांना वेड्यात काढू लागले.कुचेष्टाही करू लागले.पण घागसुद्धा याच मातीत जन्मलेले असल्याने लोकांच्या वृत्ती प्रवृत्तींचा त्यांनाही चांगलाच अभ्यास होता.पाऊस पडेल मग मी शेती करीन अशा मार्गाने घागांना मुळात जायचेच नव्हते.पण काही दिवस अभ्यास करण्यात त्यांनी घालवले.चारदोन वर्षातील निरीक्षणाचा त्याचबरोबर ते करीत असलेल्या प्रयोगांचा त्यांना चांगलाच फायदा झाला.मुळात याचं मातीत आपण लाखाचे धनी ठरू शकतो हा त्याचा आत्मविश्वास दृढ झाला आणि पुढचे आडाखेही पक्के झाले.
           त्यांच्या इतकीच शेतात मेहनत घेणारी त्यांची पत्नी त्यांच्या निर्णयात डोळसपणे साथ देत असल्याने
त्यांनी मोठ्या शेतीचे गणित पक्के केले.जवळच असलेल्या डोंगरावरील दहा एकर जमीन त्यांच्या स्वप्नाला खुणावू लागली.मनासारखा व्यवहार ठरला.एक मोठी रक्कम उभी करायची होती.एक प्रकारचा पट लावायचा होता.घरात होतं नव्हतं ते गहाण ठेवून, विकून वेळेत सौदा केला.विकत घेतलेला सरळ उभा डोंगर बघून वेडे म्हणणारे चेकाळले.आपण म्हणत होतो ते खरं होणार म्हणून नाक्यावरच्या टपरीवर बसून फुकट चहा पाजत होते आणि टाळी मागत दिवस ढकलत होते.आणि इथे हा जवान तहानभूक हरून घेतलेल्या जमिनीवर आनंदवन फुलवण्याचे स्वप्न उराशी बाळगून घाम गाळीत होता.घेतलेल्या जमिनीच्या सीमा निश्चित करून सगळी रानटी झाडे झुडपे काढून डोंगर मोकळा केला.पुढच्या उन्हाळ्यात पानाड्याला आणून पाणी पाहिले आणि विहिर खोदून घेतली.त्याच पावसाळ्यात अडीच एकर जमिनीवर बांबूची लागवड केली. बांबूनी जोर धरताच साळंद्रीनी मुळे उकरायला सुरूवात केली.एवढी मोठी लागवड पाण्यात जातेय की काय अशी स्थिती असतानांच भर पावसात त्या डोंगरावर समतल होऊ शकेल अशा दोन अडिच गुंठ्याच्या जागेत झोपडी बांधून सारा संसारच त्या डोंगरात आणला.





           तिसर्‍या वर्षात बांबू उत्पादन देऊ लागला.अधे मधे दलाल न ठेवता सरळ कोल्हापुरात माल विकून अर्ध्या कर्जातून गडी मोकळा झाला.आता आपल्या विचाराचे व प्रयोगशील तसेच मेहनती शेतकऱ्यांचा शोध घेऊन चर्चा आणि कृषीभेटी सुरू केल्या.अशाच शेतकर्‍यांची संस्था निर्माण केली.अशाच वाटचालीत फणस लागवडीचा प्रयोग केला.तिसऱ्या वर्षी फणसाचं चांगलं उत्पन्न मिळतय याची खात्री पटली.मग गेल्यावर्षी तर कोकणाच्या भुमीत क्रांतिकारक ठरावा असा रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी केला.मला फोन करून बघायला बोलावलं.ती तुतीची शेती,रेशीम किंड्यांच्या अळ्या वाढविण्याचे तंत्र, कोषनिर्मीतीकरीता उभारलेली विशिष्ट झोपडी हे सगळं बघून २०१७ मध्ये त्यांना संघाचा बळीराजा पुरस्कार किती योग्य जागी दिला गेला याचं समाधान मिळालं.





                काल माझ्यासोबत साळवीसर,हटकरसर व ओणीचे पाटील सर होते.आम्ही मूरच्या संजय सुतारांना शुभेच्छा जात होतो.सौंदळच्या हद्दीत गाडी शिरताच मी म्हटलं " इथे सौंदळमध्ये तुम्हाला भगिरथाच्या पुत्राचे दर्शन घडवितो. " त्यांचा शेतीतला प्रवास सांगताच त्यांनाही त्यांना भेटण्याची उत्कंठा वाढली.सौंदळच्या बाजारपेठेत रस्त्यावरच उजव्या बाजूस ग्रामदैवत असून पिंपळ वृक्ष आहे तिथे डाव्या बाजुला बारीक रस्ता जातो.तीनएक किमी गेल्यावर घागांचा डोंगर लागतो.त्या डोंगरातील बागेतून कच्चा रस्ता त्यांच्या घरापर्यंत जातो.पुरूष दीड पुरूष उंचीच्या फणसांच्या झाडांमधून जाणारा रस्ता स्वत:ला धन्य मानत असेल कारण गेल्या चार वर्षात अनेक शेतकरी,कृषीतज्ज्ञ , पर्यावरण अभ्यासक  ,विद्यार्थी,अधिकारी आणि पर्यटकही त्याने पाहिले आहेत.
            त्या उंच टेकडीवरच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या वार्‍याने स्वर्ग सुखाचा आनंद दिला आणि अंगणातून बाहेर पाहताच समोरच्या हिरवाईने आच्छादलेल्या टेकड्यांच्या सुरूवातीलाच दिसणारा मंदिराचा कळस नजर खिळवून ठेवतो.रगारगात भरलेलं देशप्रेम,जमीन कष्टवून चेहर्‍यावर आलेले तेज, मुलगा सैन्यात आहे आणि सूनबाई शेतीच्या प्रयोगात मग्न आहे हे सांगताना आपण किती आनंदी आहोत हे सांगताना वासुदेव घाग त्यांच्या दुनियेत किती रमले आहेत याचा अंदाज येतो.एका हातात खेळकर नातवाला धरून दुसर्‍या हातात चहाचा कप घेऊन येणारी त्यांची पत्नी सुखी समाधानी कुटुंबाचं वर्तुळ पूर्ण करतेय असंच वाटतं. पूर्वी कोकणात मोठ्ये प्रमाणात शेती केली जायची याचं कारण त्यावेळी अख्खं कुटुंब शेतीत राबत होतं याची आठवण घाग कुटुंब करून देतंय.अर्थात तो शेती करू पाहणाऱ्यांना एक सल्लाच आहे.


सुभाष लाड
९८६९१०५७३४


माजी सैनिक- वासुदेव घाग-सौंदळ
8459437499




             



No comments:

Post a Comment