Sunday, December 3, 2023

गोष्ट एका एकत्र कुटुंबाची *

 


           महाराष्ट्रात सध्या काका पुतण्याच्या नात्याची जोरदार चर्चा आहे.त्यांचे भांडण आहे असे म्हणण्याची घाई करणे चुकीचे ठरेल परंतु प्रकरण कोर्टात गेल्याने रंग अधिक गडद झाले आहेत.असो पण त्यांनाच का दोष द्यावा ? विभक्त कुटुंब पद्धतीवर आम्ही प्रेम करू लागल्याने चार सदस्यीय कुटुंबावर आपण थांबलेलो आहोत.
त्यामुळे मुलाच्या जन्माच्या अगोदरच काका दुस-या घरात असल्याने काका पुतण्यांचे नाते काय असणार? असलेच तर प्रेम किती असणार ? मग नातेच नसेल तर भांडण कसे असेल? एवढे असले तरी अजुनही काही एकत्रीत कुटुंबे आपल्याला पाहायला मिळतात.काही कुटुंबातील सदस्य नोकरीनिमित्त पुण्या मुंबईत असल्याने आपसूकच वेगळ्या चुली होतात.परंतु ते जेव्हा गावी येतात तेव्हा गावच्या एकाच चुलीवरचे जेवतात तेव्हा ते एकत्र कुटुंब असे आपण  म्हणतो. अशात काही कुटुंबे फक्त चार दिवस कसेतरी ढकलायचे म्हणुन सुद्धा एकत्र येतात तर काही पिढ्यानपिढ्या हसत खेळत एकमेकांच्या सुखदु:खाचे वाटेकरी होतात तिथे एक जिताजागता स्वर्ग बघावयास मिळतो.असेच एक आनंदी कुटुंब आज मला एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्याने बघावयास मिळाले.



          विद्यार्थीदशेत पाठांतराच्या निमित्ताने कवितेशी नाते जुळले आणि मनातल्या कल्पनांना शब्दबद्ध करण्याची सवय जडत गेली पण ती कविता वहीवर उतरावी ती कुणाला वाचून दाखवावी.अभिव्यक्त झाल्यानंतर उणेबरे ऐकावे,आनंदाने कधी मोहरून जावे असं कधी वाटलं नाही पण कवितेनं मात्र पाठ सोडली नाही.पुढे संसाराच्या वाटेवर नोकरी आणि गृहिणी ही तारेवरची कसरत करतांना कर्तव्याला झुकते माप देतांना बालपणी जडलेल्या अक्षर वाचनाचा छंद फुरसतीच्या वेळपुरता जपण्याच्या सवयीमुळे शब्दसंपदा वाढत गेली.प्रवासातल्या मोकळ्या वेळेत मनातल्या मनात आपसूक रूजणा-या काव्यपंक्तींनी फुलवलेला पिसारा क्षणिक सुखाच्यापुढे गेला नाही.वय वाढत राहिलं.कामाचा ताण शरीराला पेलवेनासा ठरत होता.जगण्यात नैराश्य येतंय की काय अशीही भिती जाणवू लागली.आपल्या पत्नीची ही कुतरओढ तिच्यातील कर्तृत्वाची पूर्ण माहिती असलेल्या पतीच्या नजरेतून सुटली नाही.काठ्या काड्या जमवून उभारलेल्या संसाराला जेव्हा चांगले दिवस दिसू लागले, जेव्हा एकट्याच्या कमाईतसुद्धा सर्वकाही भागवता येईल असा आशावाद आणि आत्मविश्वास दृढ झाला तेव्हा  पतीने पत्नीला तिच्या नोकरीतून सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडले.तिचे वाचन आणि  तिचे आशयघन संभाषण पाहून तिने आपला छंद जोपासत मनसोक्त जीवन जगावे यासाठी आकाश मोकळे करून दिले.

         ज्या गावाकडच्या घरात अनेक पिढ्यातील मुले खेळली बागडली,अनेकांचे संसार फुलले,अनेकांच्या आयुष्यांचे छत्र बनून राहतांना स्वत:चे असे संस्कार दिले ते घर जिर्ण अवस्थेत आल्याने त्यास नवे रूप देण्याचे सर्वानुमते ठरले.एक दिवस ते कोसळण्याचे काम सुरू झाले.कुणीतरी अर्धवट पाडलेल्या घराला कॅमे-यात कैद केले.छप्पर नसलेल्या त्या उघड्या भिंतीचा फोटो ती पाहते आणि तिच्या मनात कविता जन्म घेते.यावेळेला मात्र ती कविता कागदावर उतरवते.मुलांनी वाचली त्यांनी वडिलांना वाचायला दिली,त्यांनी घरच्या इतरांना दिली.त्या कवितेचा सहज प्रवास सुरू झाला.ती फेसबुकवर फिरती झाली.अनेकांकडून कौतुक झाले.घर पुन्हा उभे राहिले.जुन्या घराचा प्रत्येक सभासद नव्या घरातही तेवढ्याच आनंदात राहू लागला.जुन्या घराची आठवण ज्या कवितेने जपली त्या कवितेला साजशृंगार करून सिंहासनावर दिमाखात विराजमान व्हावी तशी भिंतीवरच्या फोटोफ्रेममध्ये बसविण्यात आली.खरे पाहता त्या कवितेचा आणि  कवयित्रीचा तो राज्याभिषेक ठरला.वाटूळ गावच्या बांबरकर घराण्याच्या नव्याने डौलाने उभ्या राहिलेल्या नव्या घरात पाऊल ठेवताच कुणाचेही लक्ष ती फ्रेम आकर्षून घेते.ही कविता वाचली जाते.त्या कवितेच्या खाली नाव झळकतंय कवयित्री सौ.वीणा विश्वास चव्हाण.

          या एका कवितेने गेल्या अनेक वर्षात रूजू न शकलेल्या अनेक कवितांना पुढच्या दोन वर्षात नवसंजिवनी दिली.एक नाही दोन नाही तर साठ सत्तर कविता मोबाईलच्या नोटपॅडवर नाचू लागल्या.आम्हाला मुक्त करा म्हणून साद घालू लागल्या. कवयित्री मात्र आपल्या आनंदाकरीता लिहिलेल्या कविता इतरांना आवडतील का अशा साशंक अवस्थेत.किंबहूना कशासाठी त्या पुस्तकरूपात आणायच्या ? याच प्रश्नाभोवती फेर धरून होत्या.शेवटी एखाद्या जाणकार साहित्यिकाला दाखवून खरंच त्या पुस्तक रूपात आणण्यासाठी योग्य आहेत का हे जाणून घ्यायचे ठरले.अत्यंत साधेपणाने राहणा-या,भिडस्त स्वभाव असलेल्या कवयित्रीला पाहून प्रथम दर्शनी या कविता काय करणार असेच वाटेल.ज्येष्ठ कवयित्री योगिनी राऊळ यांनी कवितांचे हस्तलिखित हातात घेतले तेव्हा त्यांचाही भाव तोच होता परंतु जेव्हा एकेक कविता नजरे खालून जाते तेव्हा  हे काही वेगळंच पाणी आहे याची त्यांना प्रचिती येते.हे काव्यधन लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे याचा त्यांनी आग्रह धरला आणि  कवितेचा पुढचा प्रवास सुरू झाला.


          विराज चव्हाण हा एक तरूण सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासणारा नव्या पिढीचा शिलेदार.कोकणच्या मातीत बालपण शिक्षण झालेले असल्याने त्या मातीचे अनेक संस्कार त्याच्या बालमनावर कोरले गेले.मुंबईत नोकरीस आल्यानंतर त्या मातीपासून दूर राहतांना मनात उमटणा-या भावनांचा कल्लोळ त्याला स्वस्थ बसू देत नाही.त्या भावनांना कधी कवितेत तर कधी कथारूपात मांडून तो स्वत:ला मोकळे करतो.उद्याचा मोठा साहित्यिक आज त्याच्या लेखणीत दिसतो आहे.सौ.वीणा या त्याच्या सख्ख्या काकू कविता करताहेत हे जगाला सांगतांना त्याच्या डोळ्यात जी चमक उभी राहते ती नात्याचे गहिरेपण सांगते.त्याचे साहित्यातील मित्र मंडळ फार मोठे आहे.नुसते मोठे नाही तर एकमेकाला हात देऊन इतरांना मोठं करण्याची दानत त्यांच्याकडे आहे हे विशेष नमूद करतो आहे.त्याच मित्र परिवारातील नव्या दमाचा कवी आणि  प्रकाशक म्हणून सध्या साहित्य वर्तुळात सध्या चर्चेत असलेला गितेश शिंदे त्याच्या नवसृजन प्रकाशनामार्फत चांगल्या पुस्तकाचे सगळे निकष पार पाडून एक सुंदर पुस्तक तयार करतो.त्याचे नाव आहे ' अजुनही काही भावतं तिला '

         विराजचा मित्र परिवार पुन्हा आज एकत्र आला तो बोरीवलीतल्या प्रबाेधनकार नाट्य संकुलातील एका छोट्या सभागृहात.औचित्य होतं सौ.वीणा विश्वास चव्हाण यांच्या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे.ज्येष्ठ कवी आणि  विशेषत:  आनंदयात्री ' या कार्यक्रमाने उभ्या महाराष्ट्रात सातशेच्यावर प्रयोग करणारे प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक राजेश देशपांडे,मोडीदर्पण दिवाळी अंकाचे संपादक सुभाष लाड,सुप्रसिद्ध लेखक-कवी अशोक लोटणकर, कवयित्री योगिनी राऊळ,प्रकाशक गितेश शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते संतोष मराठे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
           दिनेश मोरे यांच्या खुमासदार निवेदनाने रंगत चाललेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेणा-या रसिकांनी सभागृह भरून गेले होते.एकंदरीत हा कार्यक्रम एखाद्या घरचा लग्नविधी असावा अशा त-हेने चव्हाण कुटुंबातील आबालवृद्ध नटून थटून वावरत होते.किती काका किती काकू आणि किती पुतणे पुतण्या. आपल्या कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्ती तिच्या अर्ध्या आयुष्यानंतर आपले मौलिक विचार घेऊन जगासमोर येते आहे.तिला कवियित्री हे संबोधन आजपासून मिळणार आहे या  सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हावे व त्यासाठी उपस्थित राहणारी सर्वच पाहुणेमंडळीचे योग्य ते आदरातिथ्य करावे यासाठी लगबग दाखवणारी चव्हाण कुटुंबीय मंडळी पाहून या एकत्रीत कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
     


         'अजूनही काही भावतं मला ' हे पुस्तक का वाचावं याबाबत सगळेच बोलले किंबहुना आज तोच बोलण्याचा विषय होता.परंतु या कार्यक्रमातून जे शिकायला मिळाले,बघायला मिळाले त्याचाही सहजपणे ऊहापोह झाला.आपल्या मातीतल्या माणसाला आपणच मोठे करायचे हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणा-या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या मुशीत घडलेले  विराज चव्हाण हे त्यांच्या काकीच्या पुस्तक प्रकाशनासाठी तळमळीने काम करतात हे अनेकांच्या भाषणातून अधोरेखीत होत होते याचाच अर्थ आज नात्यांची वीण सैल होत असतांना दिसते आहे अशावेळी सौ.वीणा विश्वास चव्हाण यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेला एकोपा भरकटलेल्या समाजापुढे आदर्श आहे.सौ.वीणाताईंना पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा देतांना त्यांच्या कुटुंबीयांतील एकमेकांबद्दलचे प्रेम ,आदरभाव वाढत जावा यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

सुभाष लाड 










No comments:

Post a Comment