Wednesday, December 20, 2023

आणखी एक ग्रह निखळला !


               'माझी दिनदर्शिका' पोस्टात टाकण्याच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोस्टात जात होतो.चालत जायला मला आवडते पण दोन दिवस लोणावळ्यात घालवल्यानंतर थोडा शिण जाणवत होता तरीही मी चालतच होतो.सकाळचे अकरा वाजता ऊनही जाणवत होते.मोबाईल वाजला.बाळा चव्हाण नाव होते.नेहमीसारखेच कुठे आहेस या प्रश्नाचं उत्तर दिलं.तुला काही कळलं का ? हा पुढचा प्रश्न कधीतरी कुणीही विचारल्यावर ऐकणारा थोडा थबकतो तसा मी ही थबकलो ,जाग्यावर उभा राहिलो.मी नाही म्हटल्यावर " अरे आपला सुरेश गेला "
"कोण सुरेश ? "
" सुरेश परशुराम "
" काय ? कसं शक्य आहे ? परवाच आमचं  बोलण झालं,एकोणीस तारखेला त्याचं डोळ्यांचं ऑपरेशन आहे आणि मी वीस तारखेला भेटायला जाणार आहे."
वस्तुस्थिती खरी असल्याचं मनाला पटत नव्हतं आणि शरीराला ते असह्य वाटत होतं.मी उन्हातच उभा राहून बोलत होतो याचेही भान नव्हते.पळत जावं आणि सुरेशला विचारावं 'हे सगळं तुला माहित असताना मला का खोटं बोललास ?' असा जाब विचारावा ,निदान शेवटचं दर्शन घ्यावं हे ही आता आपल्या हातात नव्हतं. त्याच वेळेला त्यानेच गोळा केलेल्या असंख्य प्रिय जनांच्या खांद्यावरून अखेरचा प्रवास सुरू झाला होता.किमान दोन तास अगोदर कळलं असतं तरीही पोहोचता आलं असतं.नशिबाला दोष देण्याशिवाय हाती काहीच नव्हतं.माझ्या सारखी अनेकांची तीच गत झाली.
             गेल्या तीस वर्षातले आम्ही काही दोस्त आहोत.आता सगळेच सेवानिवृत्त झालो आहोत.सगळेच राहायला दूर आहोत पण मनाने मात्र अगदी जवळ.आम्ही आमच्या तरूणपणात एकत्र आलो असलो तरी तेव्हाही आणि आताही शाळकरी मुलांसारखी निरागस आणि खेळकर मैत्री जगत आलो.अधाटे सरांनी पंच्याहत्तरी केलीय,सुरेश बहात्तरीचा  बाकीचे आम्ही चार आठच्या फरकाने लहान असलो तरी आवश्यक तो आदर ठेवून एकाच वयाचे होऊन जातो.गेल्या तीस वर्षांत अनेकांच्या वाट्याला दु:खद प्रसंग आले त्या त्यावेळी हातातले काम टाकून धावत जाणारे नऊ जण आम्ही एका मताचे होतो. सुखात जाणे हे होतच होते  जेव्हा आधाराची गरज असे तेव्हा प्रत्येकजण कोण पुढे पळे तो अशी भावना जपत आलो.
           आमची प्रत्येकाची वैयक्तिक जीवन जगण्याची रित वेगळी आहे.छंद वेगळे आहेत.पण मित्र म्हणून जगताना त्याचा अडसर कधी आला नाही किंवा माणूसपणाच्या वागण्यात कसूर जाणवली नाही. त्याला कारण आम्ही आमच्यातल्या माणसाचा जय करीत गेलो.यातला कोण कोणाच्या आयुष्यात कधी कसा आला हा वेगळा विषय होऊ शकेल.पण जेव्हा केव्हा आला तो जणू फार  वर्षांपासूनचा असल्यासारखा मिसळुन गेला. शेवटी आम्ही नऊ जण नवग्रहांसारखे वेगवेगळया राशींचे गुणधर्म घेऊन स्वतःभोवती फिरणारे पण निरागस मैत्रीच्या सूर्याभोवती फिरणारे.त्यातला एक ग्रह कोरोनाच्या काळात त्याच्या दुर्धर आजाराने निखळला.बारीक शरीर यष्टीचा प्रकाश अन्यायाविरुद्ध पेटून उठताना पहाडालाही टक्कर देण्याची हिंमत ठेवायचा हे त्याचे वैशिष्ट्य त्याने अंगातल्या कर्करोगाशी सामोरं जातानाही जपले होते.म्हणायचा " मरण कोणाला चुकलंय पण जगायचं ते वाघासारखे ". आणि तसंच जगला.मी शेवटचा भेटायला गेलो तेव्हा मलाच धीर देत म्हणाला " काही होत नाही रे मला." मी माघारी फिरून तासभरही  झाला नसेल आणि त्याने मान टाकली ती आयुष्यातली पहिली आणि शेवटची पण जिथे अवघे विश्वच झुकते त्या नियंत्याच्या चरणाशी.
          आम्ही बृहन्मुंबई महापालिकेतील सेवा करून नियत वयोमानानुसार एकेक जण सेवानिवृत्त झालो.पहिले अधाटे सर. त्यांचा निरोपाचा कार्यक्रम पुढील सर्वांच्या साठी तो रिवाज ठरला.काही जणांच्यासाठी त्यांच्या शाळेतल्या मित्रांनी पुढाकार घेतला असेल तर आम्ही त्यात सहभागी झालो तर कुणाला आम्ही आमच्यापुरता स्वतंत्र कार्यक्रम करून त्याला मित्रत्वाची सलामी दिली.तसा स्काऊट गाईड  विभागात कार्यक्रम करून निरोप देण्याची प्रथा आम्हीच सुरू केली.त्याचे पहिले मानकरी डि.स्का.मा.श्री.नर हे ठरले.मग पुढे आमच्या सहवासात अल्पकाळ आला असेल पण आम्हा सर्वांना तो किंवा ती भावलेली असेल तर त्यांच्यासाठीही तो कार्यक्रम व्हायचा जणू मग ती प्रथाच पडून गेली.एक पुष्प गुच्छ किंवा प्रेमाची शाल देऊन त्या व्यक्तीला शुभेच्छा द्यायला आमचे सुरेश पाटील बोईसरहून सकाळची गाडी पकडायचे..नलावडे बार्शीहून आदल्या दिवशी निघत.जीवन पाटलांच्या नात्यातलं कुणी दगावलेलं नसलं म्हणजे ते ही " मला लवकर निघायचंय " असा घोष करीत येणार.सुरेश पाटलांचं काही वेळा परखड मत असणार. " मला तो न पटलेला आहे ,मी येणार नाही पण तुम्ही जात असाल तर माझीही वर्गणी  घ्या." असं म्हणून विषय बंद करायचा.
        सुरेश मैत्रीसाठी विशाल सागर होता तर चुकीच्या माणसासाठी आग होता. तो प्रामाणिकपणाचा हिमालय होता तर आदरातिथ्यासाठी कपिला होता.होय त्याच्याकडे हे चार गुण होते आणि ते कमालीचे होते. या गुणांचं संवर्धन करताना त्याचे आर्थिक नुकसान झाले, मानसिक त्रास झाला पण सुरेश पाटलांनी आत्मसन्मानाच्या बाबतीत तडजोड केली नाही. हीच तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.पैशाच्या मागे धावता धावता सामाजिक भान विसरून स्वतःपुरता जगण्यात मश्गुल असलेल्या दुनियेत  दसऱ्याला लुटण्यासाठी आपट्याची पाने पसरून ठेवतात तसे ससमाजासाठी, मित्रांसाठी एवढेच काय गरजवंतासाठीही स्वतःला समर्पित करणारे सुरेश पाटील कदाचित कुणा अनोळखीसाठी ही अतिशयोक्ती वाटेल पण जो जो त्यांच्या सहवासात आला असेल तो तो ही उक्ती कमीच आहे असेच म्हणेल.
        ज्या काळात बोईसर मुंबई या रेल्वेमार्गावर गाड्यांची संख्या मर्यादित असतांना या परिसरातील शिक्षकांना शाळेतील मुलांना न्याय देतांना मोठी कसरत करावी लागे.सकाळच्या सत्रासाठी साडेचारला घर  सोडावे लागत असे.संध्याकाळच्या सत्रात काम  करणाऱ्यांना पाच वाजता शाळा सोडावी लागे.म्हणून ते शिक्षक मुख्य स्टेशनच्या जवळच्या शाळांची मागणी करीत. त्यांना मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळावी लागे.प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सुरेश पाटलांना हे मंजूर नव्हते. त्यामुळे एखादा अधिकारी उद्दामपणाची भाषा करू लागल्यास ताठ मानेने जगणारा हा मावळा त्याला तात्काळ जमिनीवर आणायचा.
आदराची भाषा सुद्धा मग अरे तुरवर यायची.सुरेशचे ते रूप ज्याने अनुभवले ते कधी सुरेशच्या वाटेस आले नाहीत पण इतरांनाही ते सावध करायचे. पण तेवढाच हा दिलदार माणूस आपणाकडून काही चुकीचे झाले असल्यास त्यावेळी बिनशर्त माफी मागण्यास मागेपुढे पाहात नसे.असं नितळ स्वच्छ पाण्यासारखं त्याचं जगणं होतं.
        तो उत्तम गृहस्थी होता.कुटुंब वत्सल होता. नोकरीत असतांना त्याला कुटुंबाकडे मनासारखे लक्ष देता आले नाही. पत्नीही शिक्षिकाच असल्याने तिच्या सेवानिवृत्तीनंतर आपण ती कसर भरून काढू अशी आशा बाळगून असलेल्या सुरेशच्या नशिबाने इथे धक्का दिला. न समजलेल्या आजाराने परिसीमा गाठली.सुरेश ठाम उभा राहिला पण वैद्यांनी हात टेकले.वहिनी शांतपणे निघून गेल्या.उभं घर गारठून गेलं.सुरेशने अश्रूंचा अख्खा डोह आपल्या डोळ्यांत आटवला.मुलांना कवेत घेतलं " नियतीचा न्याय स्विकारायचा,आईचा संसार पुढे न्यायचा.नका रडू ".असं म्हणत मुलांना त्यांचा बांध फोडू दिला.स्वतः मात्र आई होऊन त्यांना जपत राहिला. आपल्या भंगलेल्या स्वप्नांचे  तुकडे केविलवाण्या नजरेत दिसू नयेत म्हणून  चेहर्‍यावर हास्य दर्शवू लागला.पण सुजाण मुलं आणि समजदार सुनांनी आपल्या घराच्या मुख्य खांबाला आधार दिला.त्याचं मजबूत राहणं किती आवश्यक आहे याचं भान त्यांना होतं. संस्कारांचं देणं योग्यवेळी परत करण्याचे ज्यांला कळलं तो श्रावणबाळ अन्यथा निसर्ग नियमानुसार जन्मास आलेली अपत्ये एवढीच ओळख.
           खचलेल्याला बाकीच्यांनी कितीही आधार दिला तरी तो हातात दिलेल्या काठीसारखा असतो पण जगण्याची उमेद आणि ताकद घरातल्या आपुलकीच्या वागण्यातून मिळते.वहिनी गेल्यानंतर सुरेश उभा होता तो मुले,सुना आणि नातवंडांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे. त्याच्या मनावर साधा ओरखडाही पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली.असं सुख आजच्या जगात दुर्मिळ आहे याची जाणीव अनेक लोकांचे संसार पाहिलेल्या सुरेशला होती.त्यामुळे या गोष्टीसाठी आपण भाग्यवान असल्याचे तो मोकळेपणे बोलून दाखवी. त्यामुळेच त्याचे मित्रांना बोलावून त्यांना पाहिजे तसा पाहूणचार देण्याच्या त्याच्या सवयीत बदल झाला नाही. लोकांना त्यांना स्वतःला पाहिजे ते खायला मिळाले की समाधान मिळते .पण सुरेशचे समाधान दुसर्‍यांना मनसोक्त खाऊ घालण्यात होते.त्याच्या सूनांनी तो आनंद त्याला दिला म्हणून सुरेश जगत होता. त्याच्या सुनांचे कौतुक आहे आणि समाजासाठी आदर्श आहे.
          माझ्या व्यक्तिगत जीवनात माझ्या कलेवर व स्वभावावर ज्यांनी प्रेम केले, मला मोठं करण्यासाठी माझ्या सार्वजनिक उपक्रमात ज्यांनी निरलसपणे सहकार्य केलं त्यात सुरेश एक होता.माझा जसा तो सच्चा हितचिंतक होता तसा तो परखड समीक्षक होता. पहिल्या वेळी त्याने स्काऊट विभाग सोडल्यानंतर माझ्या विनंतीवरून परत आला. कोणत्याही अधिकाऱ्यांच्या आदेशापेक्षा सुरेशचा सल्ला मानणारे लोक माझ्या विभागात होते आणि हे जेव्हा मारुती कांबळेनी मला सांगितले तेव्हा मी तडक त्याच्या शाळेत गेलो.काळ्या दगडावर रेघ मारून बाहेर पडलेल्या सुरेशच्या नसानसात स्काऊटींग होतं. मी त्याला त्याच्या आत्मसन्मानासाठी आश्वस्त केलं नी गडी तयार झाला.माझ्या डिस्ट्रिक्ट स्काऊट मास्टर पदाच्या कारकिर्दीत विभागाचे अनेक उत्तमोत्तम उपक्रम करू शकलो त्याला कारण मी सांगेन ती वस्तू  पुरवण्याचे काम तत्कालीन क्षेत्रसंघटक अधाटे साहेबांनी  केले तर कठिणातील कठिण प्रकल्प यशस्वी करण्याचे काम सुरेश पाटलांसारखे सहकारी करीत होते. माझ्यासारख्या नवख्या माणसाला कैक पावसाळे पाहिलेला  सुरेश पुढे नेण्याचे काम करतांना  स्वतःचे आभारही मानून घेत नसे. माझी गाणी त्याला फार आवडत.माझं वृक्षारोपणाचं गाणं तो मला त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत बोलवायचा. मी ही जायचो.  तिथेही काहीतरी खाऊ घेतल्यावरच आपण प्रेम दिले असा त्याचा समज असायचा.
         सुरेश ज्या शाळेत गेला त्या शाळेचा तो मुख्य शिक्षक ठरायचा. खात्याच्या नियमांचा चांगला अभ्यास,दप्तरी कामात हातखंडा, शिकविण्याच्या कामातला प्रामाणिकपणा, शिस्तीचा भोक्ता, त्यामुळे मुख्याध्यापकापेक्षा याचंच वजन शाळेत असायचं. एवढंच काय तर शाळेची ओळख याच्या नावाने व्हायची त्यामुळे काही जण चरफडायचे .पण सुरेश कुणाला भिक घालत नव्हता कारण तो स्वतः  एक खणखणीत नाणं होता.आणि हो तो श्रेयाला कधी पुढे आला नाही  हे ही त्याचं एक वैशिष्ट्य होतं.
          त्या दिवशी आमच्या पर्यंत निरोप आला नाही त्यामुळे शेवटच्या दिवशी सुरेश सोबत चालायचं राहून गेलं.आता फुरसतीनं सगळ्यांनीच जायचे ठरलं.अधाटे साहेबांच्या गुडघ्याचे दुखणे वाढल्याने त्यांना येणे शक्य नव्हते . अठरा डिसेंबरला सकाळी राजेंद्र नलावडे बार्शीहून ,जीवन पाटील पेणहून माझ्याकडे पवईला आले.पुढे कांदीवलीला बाळा चव्हाण गाडीत बसले. भालीवलीत प्रदीप भोईर व विलास भोईर  यांना घेऊन आम्ही सालवडला पोहोचलो.घर माणसांनी भरलं होतं.पडवीतल्या खुर्च्या भरत होत्या रिकामी होत होत्या. कसं झालं याशिवाय दुसरा प्रश्नच नव्हता.वैभव नेमकं काय झालं हे सांगत होता.काल होतं तेच घर पण कालचं चैतन्य आज नव्हतं.
          आम्ही तसे बरेचदा सुरेशच्या घरी गेलो पण आज आमच्यात प्रकाश नव्हता आणि तिथून माघारी फिरतांना " पुन्हा लवकर या रे " असे सांगत निरोप देणारा सुरेश नव्हता. आम्ही ही आता वयस्कर होत चाललो आहोत याचे भान आले. आमची गाडी परतीचा प्रवास करू लागली.गाडीचा वेग मंदावल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही. आम्ही सुरेशच्या आठवणी जागवत होतो.

सुभाष लाड
9869105734
         


 

No comments:

Post a Comment