Sunday, December 3, 2023

*आपल्या जीवनाचे शिल्पकार गुरूवर्य शिर्केसर*

    


          हल्लीच कुणीतरी मला सहज विचारलं"आजकाल 
शिर्केसर वाॅटसअपवर दिसत नाहीत." मी मनात म्हटलं 'सर इतके बिन कामाचे आहेत का ऊठसूठ गुड माॅर्निंग लिहायला आणि देवांचे फोटो पाठवून लोकांचे मोबाईल भरून काढायला ?' पण समोरच्याचा रोख माझ्या लक्षात आल्याने सर कोणत्या कामात गुंतले आहेत याची त्याला माहिती दिली.
         लांजातल्या प्रसिद्ध न्य इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रशील आणि कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर सरांनी आपल्या साखरप्या जवळच्या भडकंबा या गावी जास्त लक्ष घालतील याची आम्हांस जाणीव होती.अत्यंत गरीबीतून आलेल्या शिर्केसरांचा बालपणीचा व नोकरी लागे पर्यंतचा काळ कठिण होता पण कंबर कसून लाथ मारीन तिथे पाणी काढीन,खाईन तर कष्टाची भाकरी या बाण्यानं जगणारी त्यांची आई जोपर्यंत होती तोपर्यंत आईनं जी जमीन कसवली त्या जमिनीत शिर्केसरांनीही नांगर धरला.शनिवार रविवारची सुट्टी आणि इतर मोकळ्या दिवसांत सर दुचाकीवर टांग टाकून दिवसातून दोन दोन फे-याही मारत असत.पत्नीचा आणि  स्वत:चा चांगला पगार असूनही सर जांतीवंत शेतक-यासारखे शेतीची कामे करीत होते?.कारण एकतर कष्ट करण्यात ते लाजत नव्हते, स्वत: पिकवलेले अ़न्न खाण्यातला स्वर्गीय आनंद काय असतो हे त्यांनी अनुभवलेले होते.त्याचबरोबर ज्या शेतीने त्यांच्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवले त्या शेतीकडे तू पाठ फिरवू नकोस हा आईचा संदेश आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत कसोशीने पाळला.त्यानंतरही त्यांनी शेती केली असती पण आजुबाजूच्या सर्वच शेतक-यांनी शेती टाकली.सरांनी एका हातात लेखणी आणि एका हातात नांगर धरला होता तो एका हातातला नांगर सुटला हे सांगतांना सर विवश होतात.
             सरांच्या आईचा  संसार तिच्या वडिलांनी आपल्या घरात उभारून दिला होता.पण मुंबईत श्रीमंतीत जगणा-या पतीचे अकाली झाल्याने वडिलांच्या निधनाने तिच्या संसाराचे छप्परच उडून गेल्यासारखे झाले.तिने वडिलांच्या घरासमोर स्वत:चे झोपडे उभारले आणि  गावात मोलमजुरी करून मुलांचा सांभाळ केला,शिक्षण केलं,मुलींची लग्नं केली. बी ए बीएड झाल्यानंतर सरांना वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळेत नोकरी मिळाली पण लांजातल्या या हायस्कूलमध्ये कायम झाल्यानंतर आईसाठी स्वत:च आणि छानसं घर बांधून दिलं.आईला जसं पाहिजे तसं जगण्याचे दिवस आले परंतु आईनं तुझ्या पगारामुळे मी शेतात राबण्याच्या आनंदाला पारखी होणार नाही असं ठणकावून सांगितलं आणि शरीर साथ देईपर्यंत ही माऊली मातीशी मैत्री करून राहिली.
           आईने वास केलेल्या त्या टुमदार घरात सरांच्या सेवानिवृत्तीच्या अगोदर जाण्याची संधी मिळाली.पुढील पन्नास वर्षे तरी तर घर टिकून राहिले असते म्हणून मी सरामना म्हटले "थोडी डागडुजी करून घर तसेच ठेवा " पण घरातली चूल गेली ,पिरसा गेला आणि  घराला वाळवीनं पोखरलंय त्यामुळे नव्या पद्धतीनं घर बांधायचं असं ठरवलंय असे सरांनी सांगितलं.



          सरांच्या नंतर वर्षभरांनं बाईही सेवानिवृत्त झाल्या आणि सरांनी आपल्या नव्या घराच्या स्वप्नाला आकार देण्यास सुरूवात केली.सर संघाच्या कामात नेहमी पुढे असतात,त्यांची उपस्थिती लक्षवेधक असते परंतु 'घर बघावं बांधून 'हा अनुभव काय असतो याची जाणीव घर बांधणा-यालाच असते तरीही संघाच्या मुख्य कार्यक्रमात सर वेळ काढून उपस्थित असतात.
              महिन्याभरापूर्वी साळवीसर,हटकरसर व हर्चेकर सर असे आम्ही चौघेजण काही कामानिमित्त साखरप्याला गेलो असतांना आगंतुकपणे रात्री ९ वा.भडखंब्याला सरांच्या घरी गेलो.घर जवळजवळ पूर्णत्वास गेल्याचे दिसले.एक वेगळ्या त-हेने केलेली उभारणी बघतच राहावे अशी आहे.एका वेळच्या भाकरीला मौताद असलेला एक मुलगा आपल्या कष्टाने,आयुष्यभर ' जगाला प्रेम अर्पावे ' या साने गुरूजींच्या उपदेशाची प्रामाणिकपणे जोपासणी करीत भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक जागून उभ्या रत्नागिरीतील शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठीत व नामवंत व्यक्ती असा प्रवास करणारे शिर्केसर आता दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्या नवीन घरातल्या साकारलेल्या स्वप्नातल्या झुल्यावर
'असे हे सारं सत्याचे' असे म्हणत सुखाचे झोके घेत असतील.
         आमच्या पिढीला स्वत:च्या वाढदिवसाचे एवढे कौतुक नाही.गेल्या तीस वर्षात त्याचे स्तोम वाढले आहे.सरांच्या नवीन घरात त्यांचा आज पहिला वाढदिवस आहे.आपण स्वत:च स्वत:च्या जीवनाचे शिल्पकार ठरलो आहोत याचा सुखद आनंद त्यांनी आयुष्याचे शतक पार करूनही घेत राहावा यासाठी त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देत आहोत त्यांच्या आयुरारोग्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहोत.

सुभाष लाड 

No comments:

Post a Comment