Tuesday, April 7, 2026

*संविधान वाचले पाहिजे !*

 

           " जगातला सर्वात मोठा विद्वान कोण असेल ? अभ्यासक कोण असेल ? पंडित कोण असेल ? तत्वज्ञानी कोण असेल ? अध्यात्मिक कोण असेल ? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील." हे विधान नुकतेच एका व्हिडिओमध्ये श्री  श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेस्वरानंद सरस्वती महाराज प्रवचन करतानाचे ऐकले आणि मला समाधान वाटले.एकेकाळी याच हिंदू धर्मातल्या तथाकथित पंडितानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत शिकण्यापासून दूर ठेवले. वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करून बाबासाहेबांना अस्पृश्य समजून त्यांना लहानपणी बिकट परिस्थितीशी सामना करावा लागला अवहेलना सहन करावी लागली. त्याच हिंदू धर्मातले एक संत महंत आपला अध्यात्मिक प्रवचन देताना विश्ववंदनीय परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण मान्य करतात, ते लोकांना मान्य करण्यास सांगतात हा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आहे.

( श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज)

          धर्म कोणताही वाईट नसतो. मुळात कोणताही थर्म  जगण्याची पद्धत सांगत असतो. पण सर्वच धर्मात मीच माझ्या धर्माचा सर्वेसर्वा आहे, मलाच माझ्या धर्माची सूत्र संस्कार आणि त्याचा अभ्यास आहे असे सांगून त्याच धर्मातल्या सामान्य लोकांना लुबाडून स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या मनासारखा एखाद्या सूत्राचा अर्थ लावून म्हणजे समाजामध्ये फिरत असतात खऱ्या अर्थाने ते धर्माचे मारक असतात. परंतु सामान्य माणूस इतर धर्मांचा सोडाच पण स्वतःच्याही धर्माचा अभ्यास करीत नाहीत. उठ सूट धर्माच्या बाबतीतला संस्कार समजून घेण्यासाठी तथाकथित पंडितांच्या पाय जवळ जातात आणि ते सांगतात तीच पूर्व दिशा समजून स्वतःचे आचरण करतात. त्यामुळे खरा धर्म बाजूलाच राहतो आणि धर्म मार्तंडाने स्वतःच्या स्वार्थासाठी चालवलेली बजबज पुरी ही समाजात ठाण मांडून बसते आणि तोच खरा धर्म आहे असे आपण समजून जातो.

           जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा धर्म म्हणून हिंदू धर्माकडे बघितले जाते. हिंदू धर्मा इतका सहिष्णु धर्म जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही मात्र याचा अर्थ दुसरे धर्म वाईट आहेत असेही होत नाही. तसेच हिंदू धर्मातील सर्वच रूढी सर्वत्र व योग्य आहेत असेही म्हणता येणार नाही. जसा काळ बदलतो तशी माणसाची जगण्याची परिस्थिती जशी बदलते. उदाहरणार्थ एखादी पूजा करताना यजमानाने सोवळे  किंवा धोतर नेसून पूजा करावी हा प्रघात जेव्हा सर्वत्र धोतर वापरण्याची पद्धत होती तेव्हा तो ठीक होता. परंतु आज व्यवहारामध्ये धोतर आपण वापरतच नाही त्यामुळे अपवाद सोडल्यास पूजेला बसणारे पांढरा लेंगा किंवा मिळेल ती पॅन्ट घालून पूजा करतात. हा बदल आपण स्वीकारला कारण जगण्याची पद्धत बदलली आहे.

( कर्नाटकातील श्री सत्यनारायण महापूजा )

          महाराष्ट्रात सत्यनारायणाची पूजा करताना १००८ तुलसी पत्रे वाहिली जातात. चौरंगाला चार बाजूला केळीचे कोंब बांधले जातात  व दोन बाजूंना समया तेवत ठेवल्या जातात. भजनात असा एक गजरही आहे.' चार बाजूला चार केळी समई लावल्या दोन चौरंगावर मध्ये बैसले श्री सत्यनारायण '. मी नुकताच कर्नाटक प्रांतात माझ्या नातेवाईकांकडे जाऊन आलो. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शाही सत्यनारायण मांडला. त्यामध्ये एका पाटावरती कलश ठेवून  नारळ ठेवला, पण चार केळीचे खांब लावले नाहीत,सत्यनारायणाचा फोटो ठेवला नाही.१००८ तुलसी पत्रे नाहीत  तर त्याऐवजी बेलपत्र भरपूर होती, मात्र फुलांची आरास केली होती. दोन बाजूला समया लावल्या होत्या. रव्याचा गोड शिऱ्याचा प्रसाद , सोबत चार-पाच ताटात सफरचंदाच्या फोडी, मोसंबीच्या फोडी, अंजिराचे दाणे आणि केळी असा सर्व नैवेद्य दाखवला. पंचारती धुपारती दाखवल्या. पण सुखकर्ता दुखहर्ता या सहित श्री सत्यनारायणाची आरतीही नाही. याचा अर्थ प्रत्येक भौगोलिक परिस्थितीप्रमाणे पूजा अर्चा केली जाते ती आपण मान्य करायला हवी. किंवा त्यात काही बदल झाला तर फार मोठा अनर्थ होईल अशा प्रकारची भीती बाळगण्याचेही कारण नाही.( मुळात श्री सत्यनारायण  या देवतेचा कोणत्याही धर्मग्रंथात उल्लेख नाही. त्या पूजेचा जन्म शतकापूर्वी पश्चिम बंगाल मध्ये झालेला आहे. लोकांना त्यामुळे आनंद मिळतो आहे त्यामुळे त्याच्यावरती अधिक बोलणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही.)

          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माच्या विरोधात कधीच नव्हते. पण हिंदू धर्मात असलेल्या अनिष्ट चाली रुढी परंपरा यांचा ते विरोध करत होते. भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा हेच केले. मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम करणारे उपासतापास यांच्या विरोधात ते होते. मनुष्य सुखाचा शोध घेण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला त्या सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदू धर्म कांडाप्रमाणे उपासतापासही केले परंतु शरीरावर परिणाम करण्या व्यतिरिक्त त्यांना त्यातून काही साध्य झाले नाही आणि म्हणून त्यांनी घोर उपासना केली.जेव्हा त्यांना दिव्य प्रचिती झाली त्यातून त्यांना जो बोध झाला तो त्यांनी जगाला सांगितला. तो मार्ग आहे अहिंसेचा होता. ' अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्याअसंग्रह''

१.अहिंसा: मन, वचन आणि कर्म  यामुळे कोणालाही कष्ट न पोहचविणे।

२.सत्य: यथार्थ ज्ञान आणि सत्य बोलणे।

३.अस्तेय: चोरी न करणे (दुसऱ्याची वस्तु न घेणे)।

४.ब्रह्मचर्य: शारीरिक आणि मानसिक संयम राखणे।

५.अपरिग्रह: अनावश्यक वस्तूंचा संचय  न करणे किंवा त्याग करणे.

       हाच भारतीय धर्माचा गाभा आहे .हा जसा हिंदू धर्म सांगतो,तसा जैन धर्म सांगतो तसाच तो बौद्ध धर्मही सांगतो.मात्र प्रत्येक धर्मातील लोक याचे पठण करतात पण पालन करीत नाहीत. दुसऱ्याला समजावून सांगतात स्वतः मात्र तसे जगत नाहीत. तसे पाहिले असता धर्म ग्रंथांची शिकवण शंभर टक्के कधीच शक्य नाही आणि अहिंसेचे म्हणाल तर ते कोणालाही शक्य नाही.कारण जिवंत झाडांची होळी करून नाचणारे आम्ही, दारु विकून सरकार चालवणारे आम्ही, गोहत्या बंदीकरुनही पैशासाठी गायीच्या मांसाची परदेशी निर्यात करणारे आम्ही धर्माच्या केवळ बाता मारतो आहोत.

        आणि आता धर्माधर्मातील रोटीचा प्रश्न केव्हाच निकालात काढला तसा बेटीचा काढला आहे. धन दांडग्याच्या,राजकारण्याच्या आणि मोठ्या कलाकारांच्या घरात जरा डोकावून पहा ' सारे भारतीय माझे बांधव आहेत ' हे चित्र दिसेल मात्र सामान्य माणूस मात्र जुनं ते सोनं म्हणून कवटाळून बसला आहे. कारण त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य समजून घेतलेलं नाही, त्यांचं चरित्र समजून घेतलेलं नाही, त्यांनी लिहिलेलं संविधान ही आम्ही पुरतं वाचलेलं नाही.

         जेव्हा पृथ्वीवर त माणसाचा जन्म झाला त्यावेळेला तो एक माणूस म्हणूनच जन्मला. पण जेव्हा स्वार्थ जन्मास आला. त्यावेळेलामाणसाने माणसाने दुबळ्या माणसाला अंकित करण्यासाठी जेवढ्या काही क्लुप्त्या करायच्या ठरवल्या त्यातून हा भेद जन्मास आला. त्यातूनच स्त्रियांना गुलामांसारखं वागवण्याची पद्धत आली. त्यातूनच देवाधिकांच्या नावाने भीती घालण्याची पद्धत सुरू झाली. ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास नाही तो माणूस अशा भीतींचा बळी पडला. तो आजही बळी पडतो आहे. या सर्वातून सामान्य माणसाची सुटका करण्यासाठी त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धुरंधर पणे चाणाक्षपणे हुशारीने संविधान निर्माण केले. पण दुर्दैव हे आहे की जसा आमच्या धर्मग्रंथांचा दुर्योपयोग करून सामान्य माणसांना नाडण्याचे काम केले गेले तसेच आज संविधानाचा दुर्योपयोग करून सामान्य माणसाला त्याच खाईत लोटण्याचे काम केले जात आहे.

         आज स्वामी सोमेश्वरांनंद सरस्वती महाराज यांच्यासारखे संत महंत ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व लोकांना विशद करून सांगत आहेत त्यामुळे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान वाचतील अशी आशा करावयास हरकत नाही.

https://youtu.be/PtQULEjBVm0?si=Y1AaSWv9wHmvfxKt

हे गीत जरूर ऐकावे.

सुभाष लाड                                        ९८६९१०५७३४


No comments:

Post a Comment