*जनमानसातला लालबागचा राजा - सुधीर साळवी*
लालबागचा राजा म्हणजे जगभरच्या भाविकांच्या नवसाला पावणारा गणपती जो लालबागमध्ये दरवर्षी गणेशोत्सवात अकरा दिवस विराजमान होतो.त्या अकरा दिवसांत लालबागच्या त्या वस्तीला छावणीचे स्वरूप आलेले असते.गणपतीच्या आगमनापासून एक वेगळाच उत्साह इथल्या कार्यकर्त्यांत संचारतो तो अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या पहाटे गिरगावच्या चौपाटीवर विसर्जन होईपर्यंत त्यात कुठेही अंतर पडत नाही.कोणत्याही गणेश उत्सव मंडळात तिथल्या वस्तीतले लोक गर्दी करतात किंवा तिथलेच कार्यकर्ते
स्वयंसेवक म्हणून हजेरी लावतात.पण लालबागच्या राजाकडे जसे जगभरातील भाविक लाखोंनी येतात तसे इथे स्वयंसेवक म्हणून सेवा द्यायला मुंबईतल्या विविध भागातले हजारो लोक विशेषत: तरुण मंडळी इथे नावनोंदणी करुन सेवा देत असतात.जसे पंढरपुरात वारकरी न चुकता वारी करतात तसे लालबागच्या राजाला हजारो वारकरी भेटलेले आहेत.
लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला .त्या निमित्ताने देशभक्ती निर्माण करणारे कार्यक्रम,मेळे आणि व्याख्याने होऊ लागली.त्याच उद्देशाने त्याच वेळी मुंबईत गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीतही पहिला गणेशोत्सव सुरू झाला.मात्र १९३४ मध्ये परळ लालबागचा बाजार बंद पडल्यानंतर येथील कोळी लोकांनी आपला मच्छीमारीचा व्यवसाय सुरू राहिल्यास गणपतीबाप्पा बसवू हा केलेला नवस पूर्ण झाल्याने सुरू झालेला हा उत्सव ९१ व्या वर्षात येतांना तो जगभरच्या भाविकांपर्यत पोहोचला आहे. लालबागचा राजा तर आता मुंबईची अस्मिता ठरलेला आहे.मुकेश अंबानी सारखा जगविख्यात उद्योगपती जेव्हा आस्थेने राजाच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा सामान्य जनतेला ही भक्ती आपसूकच तिथे घेऊन जाते.
लालबागचा राजा नवसाला पावतो या श्रद्धेला मिळालेली बळकटी हे जरी उत्सव वाढण्याचे कारण असले तरी सातत्याने मुर्तिकार श्री. कांबळी या एकाच कुटुंबाकडून मूर्ती बनवली जाणे, मूर्तीची ठेवण विलोभनीय आणि एकच असणे,इथला मंडप आणि बाह्य सजावट आकर्षक असणे, इथे येणाऱ्या लाखो भाविकांची दर्शनासाठी चोख व सुविधा युक्त व्यवस्था करणे आणि सर्वात लक्षणीय आणि प्रशंसनीय काम म्हणजे मंडळाकडे जमलेल्या निधीचा लोककल्याणार्थ उपयोग करणे. मग ते मोफत डायलेसीस असेल, युपीएससी - एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय आणि वाचनकक्ष, आपत्तीग्रस्त गावांचे पुनर्वसन, नैसर्गिक आपत्तीत मोफत धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे मानवतेचा कळस गाठणारे उपक्रम राबविल्यात या मंडळाला समाजात आदराचे स्थान मिळाले आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे याकरीता मोठे योगदान आहे हे मान्य करावे लागेल.तसेच गेली एकवीस वर्षे सचिवपदी असलेल्या सुधीर साळवी यांचे कर्तृत्वही तेवढेच महत्त्वाचे आहे.
मी राजस्थान मध्ये पर्यटनासाठी गेलेलो असतांना एका हॉटेलमध्ये लालबागच्या राजाचा मोठा फोटो लावलेला पाहताच गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीकडे विचारणा केली.ते स्वतःच त्या हाॅटेलचे मालक असून ते दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येतात हे कळल्यावर मी त्यांना 'सुधीर साळवी' यांना ओळखता का? असे विचारताच " उनको कौन नही पहचानता, वो तो सर्वेसर्वा हैं. मै मिल चुका हूॅं उनको ". मग मी कशाला थांबू ? मी पण सुरू केलं. " वह हमारे गांव के हैं.और हमारे नजदिकी संबंध है." एका दूरच्या प्रदेशात आपल्या माणसांना ओळखणारं कुणी भेटतं तेव्हा साहजिकच त्या व्यक्तीचे मोठेपण अधोरेखित होतं आणि आपली छातीही अभिमानाने फुगते.
सुधीर साळवी यांची स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीतून जडण घडण झालेली असल्याने ते कट्टर शिवसैनिक समजले जातात.मधल्या काळात कट्टर या शब्दाचा अर्थ बदललाय काय असा संभ्रम वाटावा इतक्या राजकारणी लोकांनी उड्या मारल्या. स्वार्थ आणि सत्तालोलुपता यामुळे निष्ठा, एकनिष्ठता, कट्टरता हे शब्द विसरतात आणि तिथेच जनमानसातील विश्वासार्हता संपते.पण पैशाने विश्वास विकत घेऊ शकतो हे लोकांनीच सिद्ध करून दाखविले असल्याने लोकशाही आता कुठे चालली आहे याचा अंदाज शहाण्यांना आला असेलच.गेल्या विधानसभा निवडणुकीत सुधीर साळवींना उमेदवारी मिळायला हवी होती.ती जनतेचीही मागणी होती आणि वरिष्ठांनाही तसेच वाटत असल्याने सगळं मनासारखं होईल असं वातावरण असतांना त्यांचे तिकिट कापले गेले.त्यांचे पाठीराखे संतापले.विरोधकांनी गळ टाकायला सुरुवात केली.राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर काम करणारा, लोकांच्या अडीअडचणींना धावणारा शिवसैनिक म्हणून मोठा लोक संग्रह असलेला नेता आपल्याकडे हवा हे प्रत्येकाला वाटतं पण निष्ठेलाही काही मोल आहे की नाही. कुटुंब चालवतांना प्रमुखालाही तारेवरची कसरत करावी लागते. त्यांचीही अडचण कार्यकर्त्याने लक्षात घेतली व श्रद्धा - सबुरीलाही किंमत दिल्यास निष्ठावंत म्हणून मिरवता येते.त्यावेळी निष्ठेचा तराजू वजनदार ठरला.आपला उमेदवार विजयी झाला आणि सुधीर साळवी यांची उंची वाढली.वरिष्ठांकडून पुढील काही महिन्यांतच त्यांना पक्षाचे सचिवपद जाहीर करण्यात आले.ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून त्यांनी काम केले होते त्या मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहाचे सहा नगरसेवक उमेदवार निवडून आणून त्यांनी दाखवून दिले कि जनमाणसातील लालबागचा राजा सुधीर साळवीच आहेत.
आज त्यांचा वाढदिवस.आज पूर्णवेळ ते पंढरपूर तीर्थक्षेत्री असणार आहेत.त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
No comments:
Post a Comment