Friday, August 8, 2025

महाबळेश्वरची आठवण करून देणारा अणुस्कुरा घाट

           ३ ऑगस्टच्या २०१६च्या पहाटे पहाटे मुंबईसह महाराष्ट्रातल्या घराघरातल्या दूरदर्शन समोर चिंताग्रस्त चेहऱ्याने सगळे बसले होते. दोन ऑगस्ट च्या रात्री महाड मधील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुल तुटून अनेक प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. बसंतकुमार नावाच्या वर्कशॉप मधील कामगाराच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला नाही तर आणखी कितीतरी गाड्या त्या पुरात वाहून गेल्या असत्या.ती घटना आणि त्यानंतरचे शोध कार्य आठवले की आजही अंगावर रोमांच उभे करते. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर- बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा यासह ४० जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले. वाहने व मृतदेह शोधण्याचे काम तब्बल १५ दिवस सुरु होते. नेव्ही, कोस्टल, एनडिआरएफ, स्थानिक पोलिस, ग्रामस्थ, सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करत होती. पूल वाहून गेला पण माणूसकीचे अनेक पूल येथे उभे राहिले. सामाजिक संस्थांनी अन्नधान्य पाणी पुरवले.
         सावित्री नदी वरचा पूल हा मुंबई गोवा मार्गावरील मुंबई आणि महाडच्या पलीकडील कोकण गोवा यांना जोडणारा एकमेव दुवा आहे. त्याचे महत्त्व जाणून महामार्ग विभागाने पुढील पुढील सहा महिन्यात हा पूल नव्याने बनविला.या दिवसांत प्रवाशांनी कोकण रेल्वे मार्गावर गर्दी केली असली तरी पर्यायी रस्ते मार्ग म्हणून  पुणे- कोल्हापुर मार्गे जाऊन सह्याद्रीतल्या वरंध घाट, आंबा घाट, अणुस्कुरा घाट, भुईबावडा, करुळ, फोंडा, आंबोली अशा घाटातून कोकणात उतरणे हा पर्याय स्वीकारला.सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर लवकरच आलेल्या गणपती उत्सवात कोकणात वाहणारा चाकरमान्यांचा ओढा प्रथमच पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात उतरला. यावेळी कोकणातील गाड्यांसाठी सरकारने टोल माफ करून कोकणी माणसांच्या उद्रेकाला आवर घातला. परंतु त्यावेळी कोकणी माणसांची पुणे कोल्हापूर मार्गे होणारी वाहतूक सावित्री नदीचा पूल पूर्ण झाला तरीआज पर्यंत तशीच सुरू आहे  कारण मुंबई गोवा मार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाचे तीन तेरा वाजून तो रस्ता वाहतुकीस निकृष्ट ठरला तो आज मितीस तसाच आहे. 
           २०१६ च्या गणपती उत्सवात आम्ही सुद्धा आमची गाडी घेऊन पुणे - कोल्हापूर - मलकापूर मार्गे आंबा घाटातून रिंगण्याला आलो.मग कोणी म्हणू लागले आंबा घाटापेक्षा अणुस्कुरा घाट आपल्याला जवळ आहे. कोणी म्हणाले अणुस्कुरा घाट थोडा जिकिरीचा आहे. आमच्याकडच्या शाळांमध्ये कोल्हापूरकडचे शिक्षक बरेच आहेत.मी त्यांच्यापैकी अनेकांकडे चौकशी केल्यानंतर मला समजले अणुस्कुरा घाट हा वाहतुकीस चांगला आहे. आम्ही परतीचा प्रवास अणुस्कुरा घाटातून केला. येरडवच्या तिठ्याजवळ अणुस्कुरा घाट सुरू झाल्याचा बोर्ड वाचला. का कोण जाणे. हा घाट हा रस्ता हा आपला आहे याचा आनंद दाटून आला. मग मी या रस्त्याचा इतिहास गाडी चालवत असलेल्या पंकजला ( माझा मुलगा) कथन केला.
       "राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही संस्था मुंबईतल्या चाकरमान्यांनी राजापूर व लांजा तालुक्यातील गाव खेड्यांच्या विकासाकरिता १९५३ रोजी मुंबईमध्ये स्थापन केली. गाव खेड्यात प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करण्याकरिता त्या-त्या गावातील चाकरमान्यांना व गावकऱ्यांना एकत्रित करून शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन अनेक गावांमध्ये प्राथमिक शाळा सुरू केल्या गेल्या.यासाठी कोणी आपल्या जमिनी दान केल्या, कोणी आपली झाडे दिली, कोणी आपल्या पदरचे पैसे दिले तर कोणी श्रमदान करून शाळा उभारणीच्या कामात मदत केली. त्याकाळी गावात एखादीच मध्यवर्ती शाळा सुरू झाली असेल मात्र आज त्या त्या गावांकडे पाहिल्यानंतर गावांच्या वाडीवस्तीपर्यंत शाळा निर्माण झालेल्या आपल्या दिसून येतात. आज या प्राथमिक शाळा मुलांच्या संख्ये अभावी बंद पडत आहेत हे कोकणचे दुर्दैव आहे. मधल्या काळात या दगडी मातीच्या बांधकामाच्या जागी पक्या इमारती बांधल्या गेल्या. त्यांचा आवार सजवला गेला.इमारतींना रंगरंगोटी करून मुलांना आकर्षित करण्याचे काम करण्यात आले पण आज हे सगळं मुलांविना भकास झालेलं पाहताना डोळ्यांत अश्रू येतात.
      आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण सोडल्यास तालुका पातळीवर सुद्धा आरोग्य केंद्रे उपलब्ध नव्हती. पण संघाच्या प्रयत्नामुळे तालुक्याच्या मध्यवर्ती भागात सुसज्ज इस्पितळे उभी राहिलीच तशी पंचक्रोशी किंवा दशक्रोशीत सुद्धा एसएमपी सेंटर सुरू करून गाव खेड्यातल्या लोकांना नजीकच्या क्षेत्रात आरोग्याच्या सोयी उपलब्ध झाल्या.
         १९५६ ला आरगाव,ता. लांजा येथे झालेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करावा यासाठी ठराव करून आंदोलन उभारले गेले त्यात संघ यशस्वी झाला. शेतकऱ्यांचा शेतसारा कायमचा  माफ झाला.त्या अधिवेशनातच कोकणात रेल्वे आणावी असा ठराव करण्यात आला. त्या काळात गावागावात रस्ते पोहचले नव्हते तरीपण संघाच्या दूरदृष्टीच्या पदाधिकाऱ्यांंनी राजापूर आणि कोल्हापूर यांना जोडण्यासाठी अणुस्कुरा घाटातून मार्ग काढावा अशा प्रकारची मागणी या अधिवेशनातून सरकारकडे करण्यात आली. या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर कार्यवाही सुरू झाली.वेळ बराच गेला तरी सन २००२ मध्ये अणुस्कुरा घाटातील रस्ता पूर्णत्वास गेला. पूर्वी आंबा घाट किंवा फोंडा घाटातून कोल्हापूर गाठावे लागत असे.अणुस्कुरा घाट सुरु झाल्याने वेळेची व पैशांची बचत झाली. " 
      यानंतर बऱ्याच वेळा या घाटातून माझे जाणे-येणे सुरू झाले. अणुस्कुरा गावात जिथे गाडी थांबते तिथे एक हॉटेल आहे. मी तिथे चहा पिण्यासाठी गेलो. मला चहा घेऊन आलेला मालक माझ्याकडे पाहतच राहिला. मलाही त्याचा चेहरा ओळखीचा वाटला. पण या गावात माझा कधीच संबंध आलेला नसल्याने मी चहा प्यायला लागलो. मालक पुन्हा माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि मला म्हणाला "आपलं नाव कसं?"
" सुभाष लाड "
" रिंगणे गाव ना ! "
मी " होय " म्हटलं. 
" अरे मी चंद्रकांत ,चंद्रकांत पाटील,पुनाजी पेडणेकरांचा भाचा."
 मी चहाचा कप तसाच खाली ठेवत उठलो आणि चंद्रकांतला कडक मिठी मारली. हा चंद्रकांत माझ्या वर्गात पाचवी सहावीत आमच्या गावच्या शाळेत शिकत होता. अभ्यासात खूपच मागे होता पण फार गंमत्या होता. तू शाळा सोडून गेला तो पुन्हा कधी भेटला नाही तो आज भेटला. आम्हाला दोघांनाही फार आनंद झाला. गप्पा झाल्या. मी खिशातून पाकीट काढले.त्याने ते पुन्हा खिशात टाकण्यास भाग पाडले आणि " इकडे कधी आलास तर हक्काने चहा पिऊन जा". असे सांगितले.मी निरोप घेतला.
  
       सन २०२० घ्या शिमग्यात मी पालखीसाठी गावी गेलो असताना माझे वाडी बंधु रवींद्र शेलार माझ्या घरी आले. ते त्यावेळी येरडव गावी ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते ते मला म्हणाले " तुला जुन्या गोष्टींची माहिती जाणून घेण्याची आवड आहे म्हणून तुला सांगतो.मला येरवडा गावात जुने देऊळ पाहायला मिळाले. उगवाई देवीचे मंदिर म्हणतात. त्याची पडझड झाली आहे.तू ते पाहिलेस तर तुला इतिहास शोधता येईल."  उगवाई मंदिर हे नव्यानेच मी नाव ऐकत असल्याने माझी उत्सुकता वाढली. मी अधिकची माहिती घेतली तर येरडव पाजेच्या तोंडावरती घाटमाथ्यावर ते मंदिर असल्याचे मला कळले. दुपारचे चार वाजले असल्याने आपण संध्याकाळपर्यंत जाऊन येऊ शकतो याचा अंदाज घेऊन मी रवींद्र शेलारांना आपण आजच जाऊया असे सांगितले. आम्ही त्याच दिवशी अणुस्कुरा  घाटातून वरती जाऊन उगवाई मंदिराला भेट दिली. मला रात्री मुंबईला निघायचे असल्यामुळे काळोख पडायच्या आत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. वाटेतच मुंबईवरून पंकजचा मला फोन आला. " कोरोनामुळे मुंबईतील वातावरण भीतीदायक झालेले असून सरकार लवकरच प्रवासावरती बंदी आणणार आहे तेव्हा आपण ताबडतोब मुंबईला निघा." 
     आम्ही मुंबईला आलो आणि कोरोनात घरात बंदिस्त झालो. मात्र उगवाई मंदिर आणि तो परिसर मला पुन्हा एकदा पाहण्यासाठी खुणावत राहिला. नंतरच्या काळात मी अनेक जणांना त्या भागात घेऊन गेलो त्या भागाची माहिती देत राहिलो. त्याच्यावरती ब्लॉग लिहिला तो अनेक लोकांनी वाचला. येरडव गावचे लोक त्यामुळेच माझ्या संपर्कात आले. त्यातून आपण या प्राचीन उगवाई मंदिराच्या आणि पाजेच्या प्रसिद्धीसाठी, जतनासाठी काहीतरी करायला हवं या विषयावरती चर्चा होऊ लागली. 
          गर्द झाडीत असलेल्या अणुस्कुरा घाटातून पावसाळी किंवा हिवाळ्यात प्रवास करणे हे फारच आनंददायी असते.मात्र एकदा दिवसाचा प्रवास करताना रस्त्यात कुठेच सावलीसाठी एखादे झाड नाही याची उणीव जाणवली. राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ गेली दहा वर्षे वेगवेगळ्या गावात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करुन पर्यावरण जनजागृती निर्माण करीत आहे.गतवर्षी वाटूळ - दाभोळ रस्त्यावर व्हेळ व वाघणगाव परिसरात वड, पिंपळ, चिंच,करंज व ताम्हण असे कोकणातील मातीत जगणारे ५०० वृक्ष लावण्यात आले.यासाठीच्या जाळ्या ' इंडियन ऑईल ' कंपनीच्या सहकार्यातून लावण्यात आल्या.कोकण मिडिया साप्ताहिकाने प्रसिद्धी सहकार्य केले. रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ,ता. लांजाने आयोजनात सहकार्य केले तर वाघणगाव ,व्हेळ, शिरवली विलवडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळांनी उस्फुर्त सहभाग दाखवला. वृक्षमित्र अमर खामकर यांनी ५०० झाडांना वर्षभर पाणी देण्याचे, परिसर स्वच्छतेचे काम प्रामाणिकपणे करून लावलेली सर्वच्या सर्व झाडे जगविण्याचे काम केले. यावर्षी वरील सर्व शाळांच्या सहभागातून दि.१८ जुलै २०२५ रोजी त्याच रस्त्यावर विलवडे भागात १०० झाडे लावण्यात आली.तसेच रविवार दि.२७ जुलै २०२५ रोजी अणुस्कुरा घाट रस्त्यावर झाडे लावण्यात आली. या रस्त्यापासून जवळच घाटमाथ्यावर असलेल्या शिवकालीन उगवाई मंदिर परिसरात फुल झाडे लावून तो परिसर सजवण्याचे काम करण्यात आले.
           उगवाई मंदिर हे शिवकालात बांधले असावे. मात्र या मंदिराच्या बाजूने येरडव गावात उतरणारी पाज ही काळ्या दगडात बांधलेली असून हे बांधकाम सातवाहन काळात झाले असावे असे इतिहासकारांचे मत आहे. याच वाटेच्या वरच्या तोंडावर एक भला मोठा दगड असून त्याच्या पृष्ठभागावर शिलालेख आहे. तो मराठीतील शिलालेख स्वतंत्र अक्षरात असल्याने त्या अक्षरांची जुळवा जुळव करून वाचल्यास त्याचा अर्थ बोध होण्याची शक्यता आहे. त्या शिलालेखाच्या दगडापासून खाली २५ फुटावर आल्यानंतर बारमाही पाण्याचा झरा असून तो दगडांनी बांधण्यात आलेला आहे. त्याला ढोपर बाव म्हणतात. आपल्याकडे एखाद्या मंदिराचा इतिहास माहिती नसेल, त्याची निर्मिती केव्हा झाली हे माहीत नसेल तर ते पांडवकालीन आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. त्यामुळे हे मंदिर पांडवकालीन आहे असे म्हणताना या झऱ्याची निर्मिती पांडवानी ढोपर मारून केली असल्याची दंतकथा असून त्याचे नाव ढोपरबाव असे प्रचलित आहे. अणुस्कुरा घाट फोडून रस्ता झाल्यानंतर या पाजेवरची रहदारी बंद झाली. पाजेचा काहीसा भाग रस्त्यात गेल्याने पाज पूर्णतः बंद झाली आहे.
         उगवाई मंदिर आणि परिसर हा घाटमाथ्यावर असल्यामुळे तो भाग कोल्हापूर जिल्ह्यात येत असावा असा समज होतो मात्र पायथ्याशी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील येरडव गावाच्या हद्दीमध्ये तो मोडतो. घाटमाथ्यावरती उगवाई मंदिराच्या समोरच अणुस्कुरा ह गाव असून येथील ग्रामस्थ या देवतांची पूजा - अर्चा करत असतात. तिथे होळी उभारली जाते. शिवरात्रीच्या वेळेला येथे यात्रा भरते तर शिमग्यात या मंदिरात  अणुस्कुरा गावच्या ग्रामदैवताची पालखी आणली जाते. याच गावातील तरुण मंडळी या मंदिराच्या आणि मंदिर परिसराच्या देखभालीसाठी कार्यरत आहेत. मात्र वन खात्याचे अधिकारी त्यांना मुक्तपणे काम करू देत नाहीत. खरे तर इथले शाश्वत पर्यावरण जपताना धार्मिक अधिष्ठान असलेले उगवाई मंदीर परिसर जतनीकरण करण्यासाठी येरडव, अणुस्कुरा गावातील तरुणाईला वनविभागाने,शासनाने पुढाकार घेऊन प्रशिक्षित करायला हवे. मात्र हे होताना दिसत नाही.
         येरडवची हद्द या मंदिर परिसरात संपते. इथून पुढे मुख्य रस्त्यावर येईपर्यंत त्या काळात बांधलेला बारा फुटाचा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काळे दगड रस्त्याची बाह्य सीमा म्हणून जमिनीत गाडलले आहेत. मध्येच एक पावसाळ्यातील पावसाचे पाणी वाहून नेणारी वहाळी आहे. या वहाळीचा पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून आज-काल रस्त्यात सिमेंटचे पाईप टाकून मोरी बांधली जाते तशा तऱ्हेने दगडांचे बांधकाम करून त्यावरून रस्ता नेला आहे. ते बांधकाम अभ्यासण्यासारखे आहे. असा अरुंद रस्ता आणि मोरीचे दगडी बांधकाम पाहिले की इथे बैलगाड्यांची बारमाही ये- जा होत असावी. पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत हे पाच उपयोगात येत होती. या पाजेची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी केली गेली असून सातवाहन काळात या पाजेचे दळणवळणासाठी असलेले महत्त्व जाणून ती दगडाने बांधण्यात आली असावी. शिवकाळात या वाटेचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात झाला असावा. सिद्धी जोहारने पन्हाळगडाला वेढा दिला त्यावेळी त्याच्या मदतीसाठी इंग्रजांनी तोफा पुरवल्या होत्या त्या तोफा राजापूरच्या वखारीतून आणल्या असून याच पाजेने त्या वरती चढवल्या गेल्या असाव्यात. कारण इतर कोणत्याही पाजांपेक्षा ही पाज पन्हाळगडाला जवळ असून ती बांधीव असल्याने या वाटेने तोफा चढवणे सोपे गेले असावे. 
          मुसा काजी बंदरात मोठमोठी जहाजे थांबत असत. तिथल्या जहाजावरचा माल किंवा प्रवासी हे पडावाने राजापूरच्या खाडीत आणले जात असे. त्यामुळे राजापूरच्या वखारीला मोठे महत्त्व आले होते. या वखारीतील माल देशावर नेणे व कोल्हापुरातील माल राजापुरातील वखारीत नेण्यासाठी येरडवची पाज ही महत्त्वपूर्ण ठरते. आस्मादिकांनी नुकतेच राजापूर जवळच्या पांगरी बुद्रुक या गावाला भेट दिली. त्या गावात असलेल्या हरीहरेश्वर मंदिराच्या प्रांगणात सातवाहन काळातील एक शिलालेख पाहायला मिळाला. सातवाहन काळातील असे अनेक दस्तऐवज कोकणात उपलब्ध असल्याने तसेच सातवाहनकालात कोकणात मंदिराची उभारणी झाली असावी त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे येरडवच्या पाजेलाही ऐतिहासिक दाखला म्हणून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. मंदिराच्या आसपास बैलगाड्यांचा तळ होता असेल. इथे जकातीचे नाका होता का याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जर इथे जकातीचा नाका असल्यास तेथील कर्मचाऱ्यांचे किंवा अधिकाऱ्यांचे राहण्याचे ठिकाण तिथे असण्याची शक्यता आहे. येथे आर्थिक व्यवहार सुद्धा होत असल्याने आजूबाजूच्या परिसरात ऐतिहासिक काळातील त्या त्या राजसत्तांची नाणी मिळण्याची दाट शक्यता आहे. कालौघात इथे मोठ्या प्रमाणात झाडे निर्माण झाल्यामुळे या सर्वाचा शोध घेणे हे धाडसाचे काम असले तरी इतिहास संशोधकांसाठी ही मोठी पर्वणी आहे.
         राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ हा गाव खेड्यातल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी अग्रेसर असतो, त्याचबरोबर संघाने कोकणाचे ऐतिहासिक महत्त्व जगापुढे आणण्यासाठी पुढाकार घ्यावा या हेतूने संघाचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. गेल्या पंचवीस वर्षात या पाजेचा वापर होत नसल्याने या वाटेवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. ऐतिहासिक वाट मोकळी करण्यासाठी ती झाडी दूर करणे आवश्यक असून जिथे पाज तोडून रस्ता करण्यात आला आहे तिथून नव्याने जुन्या पाजेला जोडण्यासाठी नवी पायवाट शोधणे आवश्यक आहे. येथील मंदिराची पडझड झाली असून मंदिराच्या भिंती लगत रान माजले आहे. ते काढून टाकून मंदिराचा जिर्णोद्धार करणे गरजेचे आहे. 
आज या परिसरात आयोजित केलेला वृक्षारोपण समारंभ हा अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून केलेला कार्यक्रम होता.
         संघाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम जाहीर केला. श्री. मनोहर हरी खापणे या महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विकास पाटील यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे ठरवले. अनुस्कुरा घाट परिसरात जवळपास जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे वृक्षारोपणात सहभागी होणाऱ्या सर्वांसाठी वनभोजनाचे आयोजन करण्यात आले.खापणे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यात मोलाचे सहकार्य लाभले यासाठी राजू पत्की उत्साहाने सहभागी झाले होते. तळवड्याच्या सरपंच श्रीमती गायत्री साळवी यांनी पुजनाची व्यवस्था केली तर सामाजिक कार्यकर्ते किशोर नारकर यांनी  प्रगतशील शेतकरी दादा नारकर  यांच्या सहकार्याने फुलझाडांची व्यवस्था केली.वृक्षमित्र अमर खामकर  यांनी वड,आंबा व कडूलिंबाची झाडे आणली. आप्पा साळवी, प्रा.डाॅ.विकास पाटील आणि लांजा येथून माझ्यासोबत आलेले महेंद्र साळवी सर, विजय हटकर सर, मंगेश चव्हाण सर , महादेव पाटील सर आदी मंडळीनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन केले.येरडव गावचे उमेश दळवी, जयेश दळवी, विद्या शेलार आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.संघाशी जोडले गेलेले ग्रामविस्तार अधिकारी संदीप दळवी, अभिजित कोरे ,संजय चव्हाण व मंगेश पांचाळ यांनी खड्डे काढून झाडे लावण्याचा आनंद घेतला. मुंबईहून संघाचे सहचिटणीस गणेश चव्हाण, रमेश काटकर,विराज चव्हाण, दीपक आमकर, ह. भ. प. बाळकृष्ण चव्हाण, इतिहास अभ्यासक सुनील कदम आले होतेच तसे विख्यात चित्रकार विजयराज बोधनकर कोकणातील पावसाळा अनुभवण्यासाठी अगत्याने आले होते. 
        आम्ही पहिलेच वडाचे झाड लावले त्या घाटाच्या वळणात ' इंडियन फूड हब ' या फिरत्या उपहारगृहाच्या मालक सरिफा नाईक या तरुणीने घाटात लावल्या जाणाऱ्या सर्व झाडांना पाणी टाकण्याची जबाबदारी आपण घेत आहोत असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे वृक्ष लागवड करण्यासाठी आलेल्या सर्व वृक्षप्रेमींच्या आनंदाला उधाण आले. त्याने दिलेल्या गरमागरम चहाचे भुरके मारत आम्ही पुढे झाडे लावत लावत उगवाई मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या तिठ्यावर आलो.संघाकडून इथे दिशादर्शक फलक लावण्यात आला या कामे जयेश दळवी यांचे मोठे सहकार्य मिळाले.
         आता सर्वांचे लक्ष उगवाई मंदिराकडे लागले होते.गर्द झाडीतून ऐतिहासिक वाटेवरून चालत जाताना धुकं,पाऊस यांच्या खेळाची मजा अनुभवत उगवाई मंदिराच्या पाठीमागच्या टेकडीवर उभे राहिल्यानंतर दिसणारे नजरेत न मावणारे नयनरम्य निसर्गचित्र पाहून इथे महाबळेश्वरची आठवण झाली. आमच्याच गावात असलेल्या कल्पनेच्याही पलीकडे असलेले निसर्गसौंदर्याला आज पर्यंत आपण पारखे राहिलो याची खंत वाटली. पण आता आपल्या इष्ट मित्रांना या पर्यटन स्थळाला भेट देण्याचा आग्रह करून त्यांनाही सातवाहन कालीन अणुस्कुरा घाट माथ्यावरील पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आग्रह करणार जोडीने या पवित्र कार्यात सहभागी करून घेणार हा निश्चय माझ्यासोबत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने वनभोजनाच्या वेळी झालेला विचार मंथन बैठकीत केला.बरोबर सुग्रास वन भोजनाचा आनंद ही लुटला. परतीचा प्रवास करताना कोकणातील सिद्ध हस्त लेखक दीपक नागवेकर यांचे ' मोरपंखी ' हे पुस्तक या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाने खरेदी केले. तेव्हा पुस्तक खरेदीची ही झुंबड वाचक चळवळीचा आता उभारी देणार याची खात्री मला पटली. माझ्यासोबत असलेली ही मंडळी ग्रंथस्नेही आहे हे पाहून आनंद वाटला.
        राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या स्थापनेतील धुरीणांच्या मागणीमुळे अणुस्कुरा घाट फोडल्याने केवळ कोल्हापूर जवळ आले नसून मुंबई-गोवा मार्गाला तो पर्यायही ठरला आहे.तसेच त्या घाटातील सातवाहनकालीन पाज, उगवाई मंदिर आणि शिलालेखामुळे कोकणच्या इतिहासाचे दस्तऐवज पाहण्याची संधी आणि निसर्ग सौंदर्य लुटण्याची संधी उपलब्ध झाली आहे.संघाच्या धुरिणांना शत शत प्रणाम !

सुभाष लाड
९८६९१०५७३४
अध्यक्ष 
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 

          
         


    अभिप्राय :-----------

दीपेश बारस्कर ,कोंडगे     
         सुंदर अभ्यास पुर्वक माहिती माझ्या आजीचं माहेर येरडव खामकर, त्या काळी आजी तिच्या माहेरचे याच पाजेतून
दळणवळण करायचे.
बालपणी आजी आजोबांसोबत आम्ही येरडव ला एसटीने जायचो.मला सुद्धा प्रवासात दिसणारी गावे,डोंगर,झाडे,मंदिरे यांची माहिती सांगायचे.
पाजेतून घाटमाथ्यावरचे व्यापारी कोकणात यायचे.
उगवाई,पाज आजोबांकडून ऐकिवात होते 
त्या शब्दांचा उलगडा आज झाला.वरवर ऐकलेल्या माहितीला 
एवढा मोठा इतिहास असेल 
हे आपल्यामुळे समजले.
**"*************""""

No comments:

Post a Comment