Thursday, March 14, 2024

आजही शिपोशी शिखरावर !

 


       राजापूर - लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नुकतेच इतिहास प्रस्थापित करीत पार पडले.त्या निमित्ताने शिपोशीचा ऐतिहासिक वारसा लोकांच्या पुढे मांडण्यात आला.पुरातन गांगो मंदिराबरोबर पेशवाई काळात देवळे येथून आलेल्या आठल्ये बंधुनी उभारलेले हरिहरेश्वर मंदिर,भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांना बाॅम्ब बनविण्याची कला शिकविणारे गणेश गोपाळ आठल्ये या मातीतले,केरळकोकीळचे संपादक कृष्णाजी आठल्ये,रत्नागिरीत पहिला छापखाना काढणारे जनूभाऊ आठल्ये हे ही शिपोशीचेच तर रत्नागिरीतील सहावी प्राथमिक शाळा शिपोशीत 1855मध्ये सुरू झाली तर त्या शाळेत शिकलेले गो.स.सरदेसाई हे रियासतकार म्हणून देशभर प्रसिद्धीस  पावले.ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनाही काही बुकं याच शाळेत शिकता आली.स्वातंत्र्यानंतर पडता काळ अनुभवणार्या शाहिरी कलेला ऊर्जितावस्थेत आणणारे शाहीर राजाभाऊ खामकरही याच मातीचं देणं.हा आणखी बराच इतिहास संमेलनाच्या माध्यमातून पुढे आला.या मातीचं मोठेपण या पिढीतही बघायला मिळतंय मात्र ते मांडण्याची संधी मिळाली नाही हे मनाला चटका लागून गेलं.
          ज्यांनी नवव्या साहित्य संमेलनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली ते श्री. हरेशजी जाधव काल पवईला माझ्या घरी  येऊन गेले.ते त्यांच्या पुतणीच्या साखरपुड्याकरीता मुंबईत आल्याचे कळले.पुतणी काय करते असे विचारताच त्यानी दक्षिणेकडील सिनेमात ती काम करते असे सांगत परवा अभिनेता सिद्धार्थ जाधव  घरी येऊन शुभेच्छा देऊन गेल्याचा फोटोही मला पाठवला.
' आपल्या मातीतील माणसांना आम्हीच मोठं करणार ' हा संदेश देणाऱ्या साहित्य संमेलनात आपण या मुलीला व्यासपीठ देऊन तिच्या जन्मगावच्या मातीकडून तिचा गौरव करण्याचे क्षण गमावल्याचे शल्य बोलून दाखवतांना "तुम्ही हे आम्हांला का सांगितले नाही ?" या माझ्या प्रश्नावर कोकणी माणसासारखे ठरलेले उत्तर दिले.
" माझ्याच पुतणीचं मीच कौतुक करावं हे उचित वाटलं नाही."
" पण कुणीतरी सांगितल्याशिवाय इतरांना कळावं कसं ? हा प्रश्न ही तितकाच महत्वाचा नाही का ?"


       'आता वेळ निघून गेली,पुढच्यावेळी जरूर विचार करू या ' यावरती चर्चा थांबली.बोलता बोलता मी माध्यमावर ' तेजश्री जाधव ' शोधलं.दक्षिणेकडील चित्रपटात नाव कमवून प्रथमत:च ' बलोच ' या मराठी चित्रपटात काम करणारी तेजश्री जाधव हिच्याबाबत आलेले वृत्त वाचायला मिळाले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि अनेक रत्नांना जन्म देऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून,भारतीय मुद्रण क्षेत्र,न्यायसंस्था ते कला - सांस्कृतिक इतिहास मांडायचा असेल तर शिपोशी गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा नामोल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.त्या मालिकेत आजच्या पिढीतील अभिनेत्री तेजश्री जाधव आपले स्थान पक्के करते आहे हे शिपोशीकरांना अभिमानास्पद आहे तसे संघालाही आहे.
        तेजश्रीला पुढील वाटचालीकरीता मनापासून शुभेच्छा !

सुभाष लाड 



तेजश्रीचा साखरपुडा नुकताच शिपोशीकरांच्या पद्धतीने पार पडला.






No comments:

Post a Comment